भाजपाच्या ‘फ्लॉप-शो’ची संघटन मंत्र्यांकडून दखल

By Admin | Updated: June 1, 2015 00:25 IST2015-06-01T00:25:49+5:302015-06-01T00:25:49+5:30

आमदार-पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी, संघ परिवाराचीही वचनपूर्ती कार्यक्रमाकडे पाठ...

BJP's 'flop-show' organizational union intervenes | भाजपाच्या ‘फ्लॉप-शो’ची संघटन मंत्र्यांकडून दखल

भाजपाच्या ‘फ्लॉप-शो’ची संघटन मंत्र्यांकडून दखल

जाब विचारला : आमदार-पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी, संघ परिवाराचीही वचनपूर्ती कार्यक्रमाकडे पाठ
यवतमाळ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त जिल्हा भाजपाच्यावतीने यवतमाळ मुख्यालयी वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अपेक्षित गर्दी खेचता न आल्याने हा कार्यक्रम फ्लॉप ठरला. त्याची दखल भाजपाच्या संघटन मंत्र्यांनी घेतली असून आमदार व पदाधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे.
केंद्रात व राज्यात युतीची सत्ता आणि जिल्ह्यात भाजपाचे तब्बल पाच आमदार, एक केंद्रीय मंत्री असूनही पक्षाचा वचनपूर्ती सोहळा फ्लॉप ठरू शकतो, ही बाबच मुळात कुणाला पटणारी नाही. हजारो लोकांची उपस्थिती अपेक्षित असताना अवघ्या २०० ते २५० लोकांच्या साक्षीने हा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याने पक्षस्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे. भाजपाचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री रामदास अंबटकर आणि जिल्ह्याचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांनी या फ्लॉप-शोची दखल घेत नेमके कुणाचे चुकले आणि कुठे नियोजन कमी पडले याची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्हा मुख्यालयी कार्यक्रम असल्याने सहाजिकच सर्वाधिक जबाबदारी यवतमाळ मतदारसंघाचे आमदार मदन येरावार यांच्यावर होती. जिल्ह्यातील अन्य चार आमदारांनी आपल्या मतदारसंघातून कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आणून येरावार यांना हातभार लावणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात येरावार यांनी हा कार्यक्रम तेवढा गांभीर्याने घेतलाच नसल्याचे दिसून येते. तर अन्य आमदारांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या हातभारामागे त्यांचे हंसराज अहिरांवर असलेले प्रेम हे कारण सांगितले जाते. यवतमाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असताना त्यांच्या सदस्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. संघाच्या लोकांनी पाठ फिरविण्यामागे यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भाजपा विरुद्ध संघ हा वर्चस्वासाठी धुमसणारा छुपा वाद सांगितला जातो.
पाच आमदार असताना भाजपाच्या वचनपूर्ती सोहळ्याचा फ्लॉप-शो होण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी आणि आमदार-पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची लढाई हेच मुख्य कारण असल्याचा भाजपा कार्यकर्त्यांमधील सूर आहे. येथील पदाधिकारी-कार्यकर्ते नागपुरातील दोन बड्या नेत्यांच्या गटात विभागले गेले आहे. त्यातूनच एकमेकांना उघडे पाडण्याची संधी दोनही गटाकडून सोडली जात नाही. या फ्लॉप-शोमागे आगामी मंत्रीमंडळ विस्ताराचे राजकारण असल्याची चर्चाही भाजपात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

मोदींच्या जिल्ह्यात सर्वच उघडे पडले
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी स्वत: यवतमाळ जिल्ह्यात येऊन गेले. आर्णी तालुक्यातील दाभडी येथून त्यांनी ‘चाय पे चर्चा’च्या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित केले. तेव्हापासून भाजपा आणि युती सरकारमध्ये यवतमाळ हा मोदींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले, येथे रात्रीचा मुक्कामही केला. मात्र मोदींच्या या जिल्ह्यातच त्यांच्या सरकारच्या वचनपूर्तीचा सोहळा फ्लॉप ठरल्याने येथील भाजपाचे आमदार, पदाधिकारी, मंत्री व संघ परिवाराचे सदस्य पूर्णत: उघडे पडले आहेत.

पश्चिम विदर्भ संघटन मंत्र्यांचे कानावर हात
या फ्लॉप-शोच्या अनुषंगाने भाजपाचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री रामदास अंबटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलणे टाळले. मंत्री म्हणून मी आपल्याला प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. फ्लॉप-शोची चौकशी सुरू आहे का असे विचारले असता मी आपणास दोन दिवसात येऊन भेटतो, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

मी वचनपूर्ती सोहळ्याला नव्हतो, हजारो अपेक्षित असताना दोनशे-अडीचशे उपस्थित असतील तर ही गंभीर बाब आहे. मी तेथील नेत्यांशी बोलणार असून या प्रकाराची चौकशीही आता केली जाईल. भाजपा कार्यकर्ते व संघ सदस्यांची उपस्थिती कमी असण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी नव्हे तर कम्युनिकेशन गॅप असण्याची शक्यता आहे.
- श्रीकांत देशपांडे
संघटन मंत्री,
भाजपा यवतमाळ जिल्हा

Web Title: BJP's 'flop-show' organizational union intervenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.