आर्णी विधानसभेतील भाजपा उमेदवारीचा वाद अखेर मिटला
By Admin | Updated: October 1, 2014 23:30 IST2014-10-01T23:30:40+5:302014-10-01T23:30:40+5:30
विधानसभेच्या आर्णी मतदारसंघात भाजपा उमेदवार नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणी उद्धव येरमे यांनी तांत्रिक पळवाट शोधून कायदेशीर बचाव घेण्याचा प्रयत्न केला.

आर्णी विधानसभेतील भाजपा उमेदवारीचा वाद अखेर मिटला
यवतमाळ : विधानसभेच्या आर्णी मतदारसंघात भाजपा उमेदवार नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणी उद्धव येरमे यांनी तांत्रिक पळवाट शोधून कायदेशीर बचाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. अखेर येरमेंच्या माघारीमुळे येथील भाजपाच्या अधिकृत उमेदवारीचा वाद संपुष्टात आला.
आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मंत्री शिवाजीराव मोघे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने विष्णू उकंडे, शिवसेनेने संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे उमेदवार उद्धव येरमे यांनी माघार घेतल्याने राजू तोडसाम यांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. सेनेचे उकंडे राष्ट्रवादीत आणि भाजपाचे धुर्वे शिवसेनेत ऐनवेळी गेल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचा फटका या उमेदवारांना बसू शकतो. माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचा गट यावेळी सोबत नसल्याने काँग्रेसची चिंता काही प्रमाणात वाढणार आहे. मात्र अनेक वर्षांपासूनच्या छोट्या छोट्या विरोधकांशी मोघेंनी केलेली मैत्री काँग्रेससाठी जमेची बाजू ठरली आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड, काँग्रेसचे देवानंद पवार, राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, भाजपाचे अजय दुबे यांच्यात लढत होत आहे. शिवसेना ही नेहमीच भाजपाला गृहित धरते, किंमत देत नाही, विश्वासात घेत नाही आदी अनेक वर्षांपासूनच्या भाजपा कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या. यावेळी भाजपाला आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची संधी चालून आली आहे. भाजपा आणि समकक्ष सर्व शाखांची एकजूट यावेळी पहायला मिळणार आहे. काँग्रेसने सेनेच्या विरोधात यावेळी बंजारा कार्ड वापरले आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार मतदारसंघाबाहेरील असल्याची ओरड ऐकायला मिळते. राष्ट्रवादीच्या वसंत घुईखेडकरांसोबत कुणबी समाज किती ताकदीनिशी उभा राहतो यावर त्यांचे गणित अवलंबून आहे. दलित व अल्पसंख्यक समाजाची साथ काँग्रेसला जास्त मिळते की राष्ट्रवादीला याकडे नजरा लागल्या आहेत. मुलगा यवतमाळातून रिंगणात असल्याने माणिकराव ठाकरेंचे आपल्या दिग्रस-दारव्हा या परंपरागत मतदारसंघाकडे नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही दुर्लक्ष होत असल्याचा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मनोहरराव नाईकांविरोधात शिवसेनेच्या प्रकाश देवसरकर यांनी दंड थोपाटले आहे. येथे भाजपाने वसंत पाटील, काँग्रेसने सचिन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. पुसदची काँग्रेसची उमेदवारी स्थानिक अल्पसंख्यकाला मिळेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ती महागाव तालुक्यात दिली गेल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर आहे. पुसदच्या बालेकिल्यातील बंगल्यासमोर हवेलीचा खरोखरच टिकाव लागतो काय, याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विजय खडसे यांच्या विरोधात भाजपाचे राजेंद्र नजरधने, शिवसेनेचे शिवशंकर पांढरे, राष्ट्रवादीचे मोहन मोरे रिंगणात आहेत. गतवेळी युतीत असल्याने नजरधने यांनी काँग्रेसला जोरदार लढत दिली होती. मात्र यावेळी भाजपा, शिवसेना स्वतंत्र लढत असल्याने नजरधनेंच्या परंपरागत मतांची विभागणी होणार आहे. त्याच प्रमाणे दलित व मुस्लीम मतांचेही काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विभाजन होण्याची चिन्हे आहे.
काँग्रेस उमेदवाराबाबत नाराजी असली तरी या नाराजीचा फायदा रिंगणातील प्रमुख तीन उमेदवारांपैकी नेमका कुणाला मिळतो याकडे लक्ष लागले आहे. बहुजन समाज पार्टीने सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यातही यवतमाळातील बसपा उमेदवार काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. (प्रतिनिधी)