भाजपा खासदार-आमदारांत मतभेद
By Admin | Updated: February 21, 2016 01:50 IST2016-02-21T01:50:29+5:302016-02-21T01:50:29+5:30
भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे.

भाजपा खासदार-आमदारांत मतभेद
जिल्हाध्यक्ष निवड : प्रदेशाध्यक्षांचा ‘रिपीट’चा निर्णय धुडकावला
यवतमाळ : भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. त्यातूनच प्रदेश कार्यालयाने जिल्हाध्यक्ष ‘रिपीट’चा पाठविलेला निर्णय येथे रोखण्यात आला आहे.
केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असल्याने भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाला वेगळेच वजन निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी भाजपात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. कुणाच्या गटाचा जिल्हाध्यक्ष व्हावा यावरून आता नेत्यांमध्येही गट पडले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या नावाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची पसंती आहे. म्हणूनच ना. अहीर हे डांगे यांना खास प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी चार दिवसांपूर्वी पुण्यात व नंतर मुंबईत घेऊन गेले होते.
केंद्रीय राज्यमंत्र्यांचा आग्रह पाहता त्यांनी सूचविलेल्या नावाला प्रदेशाध्यक्षांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे सांगितले जाते. मात्र ‘जिल्हास्तरावरील विरोध तुम्ही शमवा’ अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. डांगे यांना रिपीट केले जाणार असल्याचे वृत्त धडकताच भाजपाची स्थानिक नेते मंडळी आणि आमदार अस्वस्थ झाले. त्यांनी प्रदेश महामंत्री रवी भुसारी यांना संपर्क केला. प्रदेशाध्यक्षांच्या आग्रहापुढे आपला नाईलाज झाल्याचे उत्तर त्यांच्याकडून दिले गेल्याचे सांगितले जाते. ना. हंसराज अहीर यांनी प्रदेशाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्ष पदाचे गणित शिजवून आणल्याने येथील आमदार मंडळी व पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात ठरणार की मुंबईत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या मुद्यावरून खासदार व आमदार यांच्यातील मतभेदही उघड झाले. आमदारांचा विरोध झुगारुन खासदारांनी आपल्या सोईचा जिल्हाध्यक्ष बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या तरी या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही. राजेंद्र डांगे मात्र ‘आपणच रिपीट होणार, प्रदेशने ग्रीन सिग्नल दिला, स्थानिक विरोधही निपटून काढू’ असे कार्यकर्त्यांना दाव्याने सांगताना दिसत आहे. तर रिपीट होऊ नये म्हणून भाजपातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते आणि विशेषत: संघ परिवार कामी लागल्याचे
जिल्ह्याचे नेतृत्व खासदार ठरविणार की आमदार असा वाद भाजपात आता सुरू झाला आहे. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. अहीर यांच्या विरोधात यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या निमित्ताने उघड भूमिका घेतली आहे. वणीचे आमदार अहिरांच्या बाजूने आहे. उर्वरित चार आमदारांचा अजेंडा उघड झाला नसला तरी त्यांचीही भूमिका ‘रिपीट’ होऊ नये अशीच असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)