उमरखेड मतदारसंघावर भाजपाचा दावा कायम
By Admin | Updated: August 23, 2014 02:11 IST2014-08-23T02:11:01+5:302014-08-23T02:11:01+5:30
उमरखेड विधानसभा मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटासाठी सोडावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्या दृष्टीने रिपाइंचे नेते व संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहे.

उमरखेड मतदारसंघावर भाजपाचा दावा कायम
अविनाश खंदारे उमरखेड (कुपटी)
उमरखेड विधानसभा मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटासाठी सोडावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्या दृष्टीने रिपाइंचे नेते व संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहे. मात्र भाजपाच्या पश्चिम विदर्भ संघटन मंत्र्यांनी येथे प्रमुख दावेदार व पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतल्याने या मतदारसंघावर भाजपाचा दावा कायम असल्याचे संकेत मिळत आहे.
उमरखेड मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. विजय खडसे येथील आमदार आहेत. परंतु त्यांच्या विरोधात मतदार, पक्षातील इतर गट, आघाडीतील सहकारी पक्ष आणि जनतेमध्येसुद्धा प्रचंड नाराजी आहे. ते पाहून विरोधी पक्ष सक्रिय झाला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनीसुद्धा उमरखेड मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यासाठी दिग्रसमधून उमेदवार आयात करण्याचीही तयारी आहे. याशिवाय आणखी काही नावे चर्चेत आहेत. मोदी लाट आणि लोकसभेतील यशामुळे भाजपाचा जोर वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार विजय खडसे धास्तावले आहे. हा मतदारसंघ रिपाइंला सुटावा म्हणून त्यांचीही सुप्त इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत प्रयत्न चालविल्याची चर्चाही काँग्रेसच्या गोटात आहे.
एकीकडे रिपाइं उमरखेड मतदारसंघावर दावा करीत असताना भाजपानेही आपला दावा कायम असल्याचे दाखविण्याची एकही कसर सोडलेली नाही. भाजपाचे संघटन मंत्री रामदास अंबरकर यांनी नुकताच उमरखेड मतदारसंघाचा दौरा केला. १९ आॅगस्टला त्यांनी शासकीय विश्रामभवनावर भाजपाचे संभाव्य उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली, मते जाणून घेतली. भाजपाचा उमेदवार कुणीही राहो, सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आदेश त्यांनी दिले. मात्र त्यांचे हे आदेश दोन दावेदारांना मान्य नसल्याचे त्यांच्या बहिर्गमनावरून दिसून आले. यावेळी दावेदारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.
या सर्व घडामोडींवरून उमरखेडची जागा भाजपाच लढविणार असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहे. मात्र अखेरच्या क्षणी नेत्यांच्या वाटाघाटीत अचानक पक्षीय दावेदारीत फेरबदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.