महागाव तालुक्यातच विजेचा सर्वाधिक प्रकोप
By Admin | Updated: August 31, 2014 00:07 IST2014-08-31T00:07:42+5:302014-08-31T00:07:42+5:30
महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला.

महागाव तालुक्यातच विजेचा सर्वाधिक प्रकोप
महागाव : महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण गंभीर जखमीसुद्धा झाले. काहींना कायमचे अपंगत्व आले. विजेचा प्रकोप तालुक्यावर जरा जास्त असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीतून आढळून आले.
हवामान खात्याने यापूर्वी तालुक्यात वीज पडण्याची शक्यता २१ आॅगस्ट रोजी वर्तविली होती. त्याच दिवशी उपजिल्हाधिकारी खवले यांनी तसे मोबाईलवर मॅसेज पाठविले होते. परंतु उपजिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याकडे महागाव तहसील कार्यालयाने दुर्लक्ष केले. कुठेही सर्तकतेचा इशारा स्थानिक प्रशासनाच्यावतीने देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याच दिवशी करंजखेड येथे वीज पडून दोन जण, तर टेंभी येथे एका जनावराचा मृत्यु झाला. यामध्ये अन्य सहा जण जखमी झाले.
विशेष म्हणजे त्याच दिवशी काही वेळाने करंजखेड येथेच पुन्हा वीज पडली. २९ आॅगस्टला मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सततच्या वीज पडण्यामुळे होणाऱ्या प्राणहाणीमुळे भितीचे वातावरण आहे. २९ आॅगस्ट रोजी वरोडी येथे विजय पडली. शेतातून घरी परतत असताना सहा महिला या विजेच्या प्रकोपाच्या शिकार झाल्या. त्यामध्ये छाया अनंता अडकिणे (३५) हिचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर सुनीता किशोर तिगडवाड, रत्नाबाई अशोक अडकिणे, संध्या अनिल जाधव या महिला गंभीर जखमी झाल्या.
त्याच दरम्यान महागाव येथील आठवडी बाजारात असलेल्या अनिल मामीडवार यांच्या घरावर वीज पडली. यामध्ये घराचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झाली नाही. शहरात वीज पडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
शुक्रवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठी प्राणहाणी होऊ शकली असती. यावेळी काही काळ मोठी धावपळ उडाली होती. स्थानिक तहसील कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कमालीचा गाफील आहे. याविभागात काम करणाऱ्या कर्मचारी कायम मोबाईल बंद करून असतात. विभागाची माहिती तहसीलदारांनासुद्धा नसते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे व्यवस्थापन करण्याची वेळ आली आहे.
(शहर प्रतिनिधी)