वृक्षसंवर्धनासाठी देशभर सायकलयात्रा
By Admin | Updated: September 26, 2015 02:31 IST2015-09-26T02:31:07+5:302015-09-26T02:31:07+5:30
ओडीसा प्रांतातील गंजाम जिल्ह्यातील एक ध्येयवेडा प्रवासी फक्त सायकलवर स्वार होऊन १५ आॅगस्ट २०१४ पासून अखंड प्रवास करतो आहे.

वृक्षसंवर्धनासाठी देशभर सायकलयात्रा
ओडिशातील ध्येयवेडा : सीबाप्रसाद दास याचा उमरखेडवासीयांशी संवाद
राजाभाऊ बेदरकर उमरखेड
ओडीसा प्रांतातील गंजाम जिल्ह्यातील एक ध्येयवेडा प्रवासी फक्त सायकलवर स्वार होऊन १५ आॅगस्ट २०१४ पासून अखंड प्रवास करतो आहे. ब्रह्मपूरचा मध्यमवयीन एक सामन्य माणूस मानवी संवेदनांना हळूवार गोंजारून त्यांना आपल्या सहज कर्तव्याची जाणीव करत सारखा सायकलने प्रवास करत आहे. सीबाप्रसाद दास हे त्याचे नाव आहे.
अंगावर साधे कपडे सततच्या सायकलने प्रवास करत विश्वासाने आणि दृढ निश्चयाने ओथंबलेले त्याचे डोळे पाहणाऱ्यांना त्याच्या या धाडसी प्रवास प्रकल्पाची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. गरजेपुरत्या वस्तू, बॅगमध्ये कोंबून, सायकलमध्ये हवा भरण्याचा एक पंप, पाण्याची बॉटल, पायात स्पोर्टस शूज एवढ्या तयारीनिशी त्याचा प्रवास सुरू होतो. २०१४ मध्ये स्वतंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ओडीसा प्रांताच्या गंजाम जिल्ह्यातील ब्रह्मपूर या गावातून त्याने भारत भ्रमणाला सुरूवात केली. हे गाव आंध्रप्रदेशाच्या सीमेलगत आहे. भारतातल्या २९ राज्यांचा जवळपासू एकूण ९० हजार किलोमीटरचा प्रवास त्याने पूर्ण केला. यवतमाळ मार्गे उमरखेडला काही वेळ थांबून त्याने पंचायत समिती, वनविभाग तसेच नगरपालिका कार्यालयाला भेट दिली. तेव्हा मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी त्याचा सत्कार केला. तेथे ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा त्याने या साहसा मागचे सत्य उलगडले. भारतभर शांतता प्रस्थापित व्हावी, वृक्ष व वनराजींचे संगोपन व संवर्धन व्हावे, एड्साबाबत जागरूकता व्हावी आणि परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी नष्ट व्हावी या सगळ््याबाबीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी इत्यादी उद्दीष्टे या भारतभ्रमाणामागची असल्याचे सांगितले. या पुढचा प्रवास तो नांदेडवरून उस्मानाबाद, सांगली, सातारा, रत्नागिरी, गोवा आणि परत मुंबईवरून त्यांच्या मूळ गावी ब्रह्मपूरपर्यंत करणार आहे. या भारत भ्रमाणाची सांगता १५ आॅगस्ट २०१६ रोजी ब्रह्मपूर येथे करणार आहे. त्याची ही सातवी भारतभ्रमण यात्रा असल्याचे त्याने सांगितले.