घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:43+5:30
प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली. अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले.

घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : लॉकडाऊनमुळे घाटंजी येथे दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या वाशिम जिल्ह्यातील भाट कुटुंबीयांना अखेर शनिवारी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. यासाठी प्रशासनासह सर्वसामान्य घाटंजीकरांनी पुढाकार घेतला.
वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील हे मूळ रहिवासी आहेत. बाबाराव गिऱ्हे आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असे १३ जण घाटंजीत अडकले होते. रणजित बोबडे, प्रशांत उगले, महेंद्र देवतळे, गणेश भोयर, संतोष अक्कलवार आदींनी त्यांची माहिती तहसीलदार पूजा मातोडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज मानेपाटील यांच्यापर्यंत पोहोचविली.
त्यानंतर प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली.
अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले. जाताना गिऱ्हे कुटुंबीयांनी तहसीलदार मातोडे, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांच्यासह दररोज जेवण पुरविणाऱ्या घाटंजीवासीयांचे आभार मानले.
भावपूर्ण निरोप
वाशिममधील या नागरिकांचे घाटंजीवासींयांशी अनोखे नाते जुळले होते. त्यामुळे निरोपाच्यावेळी त्यांनी अनेकदा हात उंचावून येथील नागरिकांचे आभार मानले. त्यांच्या डोळ््यात पाणी तरळले.