जिल्ह्यातील पीक परिस्थिती सर्वोत्तम
By Admin | Updated: August 17, 2015 02:30 IST2015-08-17T02:30:09+5:302015-08-17T02:30:09+5:30
जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांची परिस्थिती सर्वोत्तम आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच एवढे चांगले चित्र शेतीच्या बाबत पहायला मिळाले आहे, ....

जिल्ह्यातील पीक परिस्थिती सर्वोत्तम
पालकमंत्र्यांचेही शिक्कामोर्तब : पाच वर्षात पहिल्यांदाच समाधान, धरणे भरल्याने रबी हंगामाचीही सोय
यवतमाळ : जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांची परिस्थिती सर्वोत्तम आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच एवढे चांगले चित्र शेतीच्या बाबत पहायला मिळाले आहे, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत ना. संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती सर्वोत्तम असल्याचे शिक्कामोर्तब केले. उमरखेडपासून वणीपर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी या सर्वच पिकांची स्थिती अतिशय चांगली आहे. कृषी खात्याचे अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी आणि स्वत: सामान्य शेतकरीसुद्धा पीक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगतो आहे. आता त्यावर खुद्द सरकारचे प्रतिनिधी असलेल्या पालकमंत्र्यांनीही आपली मोहर उमटविल्याने स्थिती आणखीणच स्पष्ट झाली आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर यावेळी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ६० टक्के पाऊस झाला तरी सर्वत्र समाधानाची स्थिती आहे. या पावसाचे कुठेही मोठे नुकसान नाही. चांगल्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होणार आहे. निसर्गाने साथ दिल्याने आता शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अवलंबवू नये, असे आवाहन करताना संजय राठोड यांनी युती सरकार संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले, धरणे ओव्हरफ्लो झाली, तलाव, शेततळे पूर्णत: भरले, कालव्यांनी पाणी वाहू लागले. त्यामुळे सिंचनाची चिंता मिटली आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी रबी हंगामातही शेतकऱ्यांची सिंचनाची सोय झाली आहे. एकूणच हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आशादायी व फायद्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पीक परिस्थिती सर्वोत्तम असली तरी शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, नापिकी याचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यावर्षी पीक परिस्थिती सर्वोत्तम असल्याने पहिल्यांदाच समाधान पहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आर्थिक दृष्टचक्रातून बाहेर निघण्याचा आशावाद झळकतो आहे.
यावर्षीसुद्धा आमच्या भागात चांगले पीक होईल. या भागाला कामापुरता पाऊस हवा असतो. जास्त झाला तर ओला दुष्काळ पडू शकतो. राज्यात १९७१ ला कोरडा दुष्काळ होता. तेव्हा आमच्या तालुक्यात परिस्थिती चांगली होती. आजही पीक परिस्थिती उत्तम आहे. परंतु कितीही उत्पन्न झाले तरी शेतमालाला भाव नसल्याची खंत आहे.
- रामकृष्ण पाटील वांजरीकर
(कृषीभूषण) वांजरी ता. पांढरकवडा
यावर्षी आमच्या परिसरात पीक स्थिती उत्तम दिसत आहे. उच्चप्रतीच्या जमिनीवरील पिकांची तर परिस्थिती एकदमच चांगली आहे. सोयाबीनचे एकरी दहा क्ंिवटलच्या कमी उत्पन्नच येणार नाही. हलक्या जमिनीला पावसाची आवश्यकता असून पाऊस पडल्यास त्यांनाही चांगले उत्पन्न येईल. - गोविंदराव जाधव
शेतकरी चोरखोपडी ता. दारव्हा
कापसाला प्रति क्ंिवटल एक हजार रुपये बोनस
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रति क्ंिवटल १००० रुपये बोनस दिवाळीपूर्वी जाहीर करावा, अशी शिफारस आपण सरकारकडे करणार असल्याची माहिती शेतकरी मिशनचे संचालक, शेतकरी नेते तथा विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
किशोर तिवारी म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी पीक परिस्थिती समाधानकारक आहे. कापूस, सोयाबीन व अन्य कोणतेही पीक शेतकऱ्यांना दगा देईल, अशी स्थिती नाही. सर्वत्र कापूस जीवंत आहे. कापसाला भाव नाही, हमीभाव केवळ ५० रुपयाने वाढविला आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यावी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्ंिवटल एक हजार रुपये बोनस तत्काळ त्याच्या खात्यात सरकारने जमा करावा, अशी आपली मागणी आहे. शासनाने १४ जिल्ह्यांसाठी नेमलेल्या शेतकरी मिशनचा प्रमुख म्हणून आपल्या पहिल्याच अहवालात एक हजार रुपये बोनसची मागणी नमूद केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्या मागणीचा पाठपुरावाही आपण करणार आहोत. हा अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल. प्रति क्ंिवटल एक हजार रुपये बोनससाठी सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदार-आमदार, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना यांचे समर्थन आपण मिळविणार आहोत. त्यासाठी वाट्टेल ते करू पण बोनसच्या मागणीवर सर्वांना एकत्र आणू, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.