जिल्ह्यातील जलाशयांनी गाठला तळ
By Admin | Updated: June 2, 2015 00:20 IST2015-06-02T00:20:59+5:302015-06-02T00:20:59+5:30
पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही.

जिल्ह्यातील जलाशयांनी गाठला तळ
१७ टक्के पाणी : पाऊस लांबल्यास जल संकट गंभीर
यवतमाळ : पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही. अशा अवस्थेत जिल्ह्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील जलाशयात केवळ १७.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लाबंल्यास जल संकट गंभीर होण्याची चिन्हे आहे. गत चार वर्षातील ही सर्वाधिक घसरण होय.
जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. मे अखेर प्रचंड तापमानाने पाण्याचे बाप्षीभवन मोठ्या प्रमाणात होते. कोरडे वातावरण आणि वाढलेल्या तापमानामुळे ही प्रक्रिया मागील तीन वर्षाच्या तुलनेत अधिक गतीने होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेबंळा प्रकल्पात सध्या ३४ टक्के पाणी साठा आहे. पाटबंधारे महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या मोठा प्रकल्प पुसमध्ये केवळ १२.५७ टक्के पाणी आहे.
मध्यम प्रकल्प गोकी, वाघाडी, सायखेडा, लोअर पुस, बोरगांव येथे सरासरी २२.९५ टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ६२ लघु प्रकल्पामध्ये केवळ १२.८७ टक्के इतके च पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी होतो. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सिंचन तलावांचीही अवस्था बिकट आहे. त्यामध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ६९ सिंचन तलाव आहेत. तर २५० पाझर तलावत आहे. यातून खरिप आणि रबीचे सिंचन केले जाते. हे प्रकल्प फेब्रुवारीनंतर कोरडे पडणार हे गृहीत धरून सिंचनाचे नियोजन केले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)