५८ हजार शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज नाकारले
By Admin | Updated: June 13, 2016 00:49 IST2016-06-13T00:49:52+5:302016-06-13T00:49:52+5:30
खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे.

५८ हजार शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज नाकारले
नवीन सभासद : खरिपात शेतकरी सापडले आर्थिक कोंडीत
यवतमाळ : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून आता खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे पडला आहे. नवीन सभासदांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेकडे निधी नाही, तर राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.
हवामान खात्याने चांगल्या पावसाचे यंदा संकेत दिले. वार्षिक सरासरीच्या १२० टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपासाठी मशागत केली. त्यासोबतच बँकांकडे कर्जाची मागणी केली. परंतु यावर्षी सुरुवातीपासूनच पीक कर्जात बँका अडवणुकीचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात चार लाख १२ हजार शेतकरी सभासद आहे. २०१५ मध्ये एक लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी एक लाख तीन हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. इतर शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे या शेतकऱ्यांना कर्जपुनर्गठणाशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे बँकांनी नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. जिल्ह्यात तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकरी आहे. परंंतु त्यांना कर्ज मिळाले नसल्याने या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नवीन सभासदांना कर्ज वाटण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी नसल्याचे सांगितले जाते. तर राष्ट्रीयकृत बँकांकडे निधी असतानाही कर्ज वितरणास टाळाटाळ करीत आहे. यामुळे नवीन सभासदांना कर्ज मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी झालेल्या बँकर्सच्या बैठकीत नवीन सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले.
कर्ज वितरण वेळेपूर्वी पूर्ण करू असे या बैठकीत सांगण्यात आले. मात्र या बँका हा शब्द कितपत पाळतात यावर शेतकऱ्यांना शंका आहे. विशेष म्हणजे या बैठकीत बँकांच्या व्यवस्थापकांनी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही बैठक बँक व्यवस्थापक किती गांभीर्याने घेतात यावरही कर्जाचे गणित अवलंबून आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही तर लोकप्रतिनिधी कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)