बोरी स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By Admin | Updated: June 20, 2016 02:17 IST2016-06-20T02:17:01+5:302016-06-20T02:17:01+5:30

भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे.

Bank Sack Bank Junk | बोरी स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

बोरी स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

बीएसएनएल सेवा कोलमडली : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
बोरीअरब : भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे. बीएसएनएलची सेवा कोलमडल्यामुळे बँकेचा कोणताही व्यवहार पूर्ण होणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीमुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी रविवारी येथे भेट देऊन माहिती घेतली.
बोरीअरब शाखेतून परिसरातील २४ गावांचा आर्थिक व्यवहार चालतो. शेतीच्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप आणि थकीत कर्जाचे पुनर्गठन कर्ज मंजूर करणे ही कामे तातडीने होण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच दिवसात बीएसएनएल लिंक नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प पडले आहे. गेल्या १९ दिवसांपासून बँकेत व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर होवून पैसे मिळत नसल्याने त्यांची एकप्रकारे अडवणूकच सुरू आहे. बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. अनेकांचे पैसे बँकेत जमा असूनही ते मिळणे दुरापास्त झाले आहे. नगदी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे घेता येत नाही.
दारव्हा-यवतमाळ रोडवर असलेल्या बोरीअरब गावात भारत संचार निगमची नवीन फोर-जी लाईन जमिनीतून खोदकाम करून टाकणे सुरू आहे. अशावेळी जुनी चालू स्थितीत असलेली भारत संचार निगमची वायर अनेक ठिकाणी तुटली आहे.
त्यामुळे बोरीअरब येथील बीएसएनएलच्या सर्वच ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे येथील स्टेट बँकेचे सर्व व्यवहारही १९ दिवसांपासून ठप्प आहे. यात शेतकऱ्यांप्रमाणेच कर्मचारी व सेवानिवृत्तांनाही चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. भारत संचार निगमचे अधिकारी मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यातच धन्यता मानत आहे. स्टेट बँकेचे कर्मचारी दररोज बँकेत जावून लिंक येण्याची वाट पाहतात, तर शेकडो शेतकरी बँकेत चकरा मारून त्रस्त झाले आहे. (वार्ताहर)

‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहिमेला फटका
बळीराजा चेतना अभियानांतर्गत सुरू असलेल्या अर्ज द्या कर्ज घ्या या मोहिमेलाही बोरीअरब येथील बीएसएनएल सेवा बंद असल्यामुळे फटका बसला. येथील स्टेट बँकेच्या शाखेत या मोहिमेसाठी रविवारी १९ जून रोजी कॅम्प घेण्यात आला. मात्र बीएसएनएल सेवा नसल्याने फटका बसला. वर्ष २०१४-१५ चे थकीत कर्जदार शेतकरी यांनी अर्ज करून त्वरित कर्जाचे पुनर्गठन व त्यातून मागील कर्जाचा हप्ता न कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु गेल्या पंधरवड्यापासून या बँकेचे लिंक बंद असल्याने अर्ज द्या, कर्ज घ्या अभियानातून कोणतेही काम होवू शकले नाही. या अभियानात शिवसेनेचे योगेश इलमे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेसमोर मंडप टाकून ७८३ अर्ज पुनर्गठनासाठी जमा करून घेतले. स्टेट बँक अधिकाऱ्यांकडे मात्र एकही अर्ज केला नाही.

Web Title: Bank Sack Bank Junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.