स्मशानावरच मरणकळा अविनाश साबापुरे यवतमाळ
By Admin | Updated: July 20, 2015 02:21 IST2015-07-20T02:21:13+5:302015-07-20T02:21:13+5:30
स्वच्छतेच्या स्पर्धेत पुरस्कार पटकावण्यासाठी पालिकेला ज्या सुंदर स्मशानभूमीने मोलाचा हातभार लावला, त्याच स्मशानावर आज मरणकळा ओढवली आहे.

स्मशानावरच मरणकळा अविनाश साबापुरे यवतमाळ
लोकमत विशेष
स्वच्छतेच्या स्पर्धेत पुरस्कार पटकावण्यासाठी पालिकेला ज्या सुंदर स्मशानभूमीने मोलाचा हातभार लावला, त्याच स्मशानावर आज मरणकळा ओढवली आहे. सौंदर्यीकरणाने राज्यभरात प्रसिद्धी पावलेली येथील पांढरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमी प्रशासकीय उदासीनतेमुळे मलूल पडलेली दिसते.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी या स्मशानभूमीचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले होते. परिसरात देखणा बगिचाही फुलविण्यात आला होता. मात्र, आज हा बगिचा पूर्णत: वाळून गेला आहे. स्मशानशेडच्या आजूबाजूला लावलेली हिरवीगार मेंदी आता गडपच झाली आहे. एकदा रंगरंगोटी करून पालिकेने स्मशानाकडे साफ दुर्लक्ष केले. प्रारंभीचे रंग आता उडून गेले तरी रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. परिसरातील उनाड तरुणांकडून येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार चालत असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले. स्मशानात दु:खी नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंटची आसने आहेत. मात्र, ही आसने आज बसण्यायोग्य उरली नाहीत. कारण जागोजाग पानाच्या पिचकाऱ्या मारण्यात आल्या आहेत. येथे असलेल्या एकमेव वॉटर फिल्टर मशिनवरही चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. वॉटर फिल्टर फोडून त्यातील साहित्या चोरून नेण्यात आले आहे. या सर्व प्रकारांवर पायबंद घालण्यासाठी स्मशानात सुरक्षारक्षकाची नितांत आवश्यकता आहे. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार व इतर नोंदीसाठी पालिकेने कर्मचारी नेमला आहे. मात्र, त्याला बसण्यासाठी कार्यालय म्हणून एखाद्या खोलीची व्यवस्था नाही. वर्षभरात या स्मशानात साधारणत: १५०० अंत्यसंस्कार होतात. त्यांच्या नोंदी ठेवून नातेवाईकांना जागीच मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी छोटे का होईना कार्यालय गरजेचे आहे.
यवतमाळची हिंदू स्मशानभूमी एकेकाळी राज्यभरात चांगल्या सुविधांसाठी प्रसिद्ध होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या ठिकाणाच्या देखरेखीकडे पालिकेकडून दुर्लक्ष झाले आहे.
एखादी अंत्ययात्रा पोहोचताच परिसरातील काही उनाड तरुण मृताच्या नातेवाइकांच्या गाड्यांतील पेट्रोल काढून घेतात. स्पेअरपार्ट चोरून नेतात. या ठिकाणी जुगार, दारू पिणे, गांजा ओढणे असे प्रकारही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे बंद
पालिकेकडून पूर्वी गरीब मृताच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत अडीच क्विंटल लाकडे आणि १०० गोवऱ्या पुरविण्यात येत होत्या. मात्र, लाकडांच्या चोरीचे प्रकार घडल्याने पालिकेने ही सोय दहा वर्षांपूर्वी बंद केली. स्मशानाची देखरेख आणि लाकूड पुरवठ्याचे काम ठेकेदाराकडे दिले आहे. त्यामुळे साहजिकच मोफत लाकडे मिळण्याच गरिबांचा मार्ग बंद झाला. आता ५०० रुपये क्विंटलप्रमाणे तीन क्विंटल लाकूड आणि ३०० रुपयांत १०० गोवऱ्या गरिबांनाही विकतच घ्याव्या लागतात. पालिकेने गरिबांना मोफत लाकडांची सुविधा पूर्ववत सुरू करावी, अशी अनेकांची मागणी आहे.