जत्रेच्या लिलावाचा तिढा सुटला
By Admin | Updated: February 12, 2016 02:58 IST2016-02-12T02:58:09+5:302016-02-12T02:58:09+5:30
रंगनाथ स्वामी यांच्या नावाने दरवर्षी वणीत तब्बल ३७ दिवसांची जत्रा भरते. मात्र या जत्रेच्या लिलावावरून नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती.

जत्रेच्या लिलावाचा तिढा सुटला
अखेर हर्रास होणार : स्थायी समितीने घातला होता मधातच खोडा
वणी : रंगनाथ स्वामी यांच्या नावाने दरवर्षी वणीत तब्बल ३७ दिवसांची जत्रा भरते. मात्र या जत्रेच्या लिलावावरून नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती. अखेर आता या जत्रेचा लिलाव करण्याचे निश्चत झाल्याने तिढा सुटला आहे.
शहरातील जत्रा मैदानात दरवर्षी तब्बल ३७ दिवसांजी जत्रा भरते. ही जत्रा संपूर्ण राज्यात परिचित आहे. होळी सणापूर्वी या जत्रेला सुरूवात होते. जवळपास हनुमान जयंतीपर्यंत ही जत्रा सुरू असते. या जत्रेच्या निमित्ताते वणीत मोठा बैलबाजार भरतो. पूर्वी हा बाजार महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्यप्रदेशातही मोठा बैलबाजार म्हणून ओळखला जात होता. या बैलबाजारात तब्बल ‘नॅनो‘च्या किमतीपेक्षाही महागड्या बैलजोड्या विक्रीस येत होत्या. आताही बैलजोड्या येतात. मात्र या जत्रेचे पूर्वीचे गतवैभव आता लोप पावत आहे. बैलबाजारावरही अवकळा आली आहे.
जत्रा नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते. आरोग्य समितीला जत्रेचे नियोजन करण्याबाबत अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यानुसार मागीलवर्षी आरोग्य समितीने तब्बल नऊ लाख १६ हजारांमध्ये जत्रेचा लिलाव केला होता. त्यापूर्वी काही वर्षे दुसऱ्याच पद्धतीने जत्रेचा कंत्राट दिला जात होता. गेल्यावर्षी आरोग्य समितीने मात्र जत्रेच्या लिलावातून पालिकेला तब्बल नऊ लाख १६ हजारांचा निधी मिळवून दिला. त्यानुसारच याहीवर्षी जत्रेचा लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र आरोग्य समितीने बोलविलेल्या दोन बैठकांना काही सदस्य उपस्थितच राहिले नाही. तिसऱ्यांदा २१ जानेवारीला झालेल्या बैठकीत जत्रेच्या लिलावाचा ठराव अखेर पारित करण्यात आला.
नगरपरिषदेत सध्या प्रचंड सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातूनच सुरूवातीला आरोग्य समितीच्या जत्रा लिलाव पद्धतीला काहींकडून खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामी सतत दोनदा आरोग्य समितीची सभा रद्द झाली. त्यानंतर स्थायी समितीने पुढाकार घेत जत्रेच्या लिलावासंदर्भात शासन निर्णयानुसार कारवाई करावी, असे म्हणून लिलावाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
एकप्रकारे जत्रेचा लिलाव न होता, एखाद-दुसऱ्याला कमी पैशात जत्रेचा कंत्राट देण्याचा घाटच घालण्यात आला होता की काय, अशी शंका यामुळे निर्माण झाली. मात्र आता यावर पडदा पडला आहे. जत्रेचा लवकरच लिलाव करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)