रेतीमाफियाकडून पोलीस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:01:07+5:30
आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. शिवाय या रस्त्यावरून पुराचे पाणी गावात येत असल्याने पिण्याच्या हातपंपाचे पाणी दूषित होत आहे.

रेतीमाफियाकडून पोलीस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील वडगाव(गाढवे) परिसरातील अडाण नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे. यामुळे शेतातील रस्त्यांचे नुकसान होत आहे. शिवाय दूषित पाणी गावात येत असल्याने पाणवठे दूषित होत आहे. यामुळे उत्खननाला मज्जाव केल्याने रेतीमाफियाने सोमवारी चक्क सावंगी येथील पोलीस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न केला.
आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. शिवाय या रस्त्यावरून पुराचे पाणी गावात येत असल्याने पिण्याच्या हातपंपाचे पाणी दूषित होत आहे. हा धोका ओळखून गावचे पोलीस पाटील प्रकाश जाधव यांनी रेतीमाफियांना उत्खनन करू नये, असे सांगितले. यावरून चिडलेल्या आरिफ मलनस याने आपल्या तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस पाटील प्रकाश जाधव यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड व चाकूने हल्ला चढविला. हा हल्ला प्रकाश जाधव यांच्या घरासमोरच माफियांनी केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तारांबळ उडाली. जाधव यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व गावकरी धावून आले. हल्लेखोर पळाल्याने प्रकाश जाधव यांचा जीव वाचला. त्यांना गंभीर दुखापत असल्याने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ठाणेदार विनय कारेगावकर यांनी आरिफ मलनससह तिघांना ताब्यात घेतले आहे.
रेती माफियांचा उपद्रव, गुन्हेगारांचा शिरकाव
गावखेड्यात रेतीमाफियांचा उपद्रव वाढला असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे रेतीच्या व्यवसायात उतरले आहे. जिल्ह्यात अनेक रेती घाटावरून राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. पोलीस व महसूल यंत्रणा ठोस कारवाई करत नसल्याने रेतीमाफिया निर्ढावले आहेत. यातून अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत.