जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: February 24, 2016 02:48 IST2016-02-24T02:48:33+5:302016-02-24T02:48:33+5:30
महायुतीच्या सरकारने रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे.

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याचे प्रयत्न
दारव्हा : महायुतीच्या सरकारने रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यातच यवतमाळसह काही जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. आपल्यालासुद्धा रुग्णसेवेत जास्त रस असून सर्व प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळवून देता यावा, यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात १९ ते ८ मार्चपर्यंत महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक टी.जी. धोटे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, गटविकास अधिकारी घुगे, मुख्याधिकारी जी. एस. पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, पंचायत समिती सदस्य माणिक राठोड, जयश्री मिरासे, कृषी अधिकारी राजीव शिंदे, पंडित राठोड, दिनेश कोठारी, गोविंदराव जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, काही ठिकाणी डॉक्टर व तज्ज्ञांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांवर उपचार करताना अडचणी निर्माण होते. परंतु आता डॉक्टरांची नेमणूक जिल्हास्तरावर करण्याचा निर्णय झाल्यामुळे रिक्त पदांची समस्या सुटण्यास मदत होईल. जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागू नये, त्यांना याच ठिकाणी सोयी उपलब्ध व्हावे यासाठी मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सध्या महाआरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. पुढील काळात सुपरस्पेशालिटी शिबिर घेण्यात येईल. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन हे शिबिर यशस्वीरित्या घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
या अभियानामध्ये डॉ.विजय मून, डॉ.झोपाटे, डॉ.मानकर, डॉ.लिंगावार, डॉ.चव्हाण, डॉ.किशोर राठोड आदींसह विविध तज्ज्ञ अस्थीरोग, किडणी, बालरोग, स्त्रीरोग या रोगांची तपासणी व उपचार करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन खरोडे यांनी केले. जीवनदायी योजनेविषयी डॉ.राठोड यांनी माहिती दिली. तर आभार डॉ.नितीन भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)