परिश्रमाला कलात्मकतेची जोड द्या

By Admin | Updated: December 9, 2015 02:59 IST2015-12-09T02:59:24+5:302015-12-09T02:59:24+5:30

प्रत्येक माणूस एखाद्या कामासाठी जीवन अर्पण करतो. मजूर, कारागीर, कलावंत आपापल्या क्षेत्रात मेहनत घेतात. पण सर्वांपेक्षा कलाकाराच्या कामाची प्रशंसा अधिक होते.

Attach artistry to work | परिश्रमाला कलात्मकतेची जोड द्या

परिश्रमाला कलात्मकतेची जोड द्या

शिव खेरा : रोटरीच्या ‘एज्युफेस्ट’मध्ये विद्यार्थी-पालकांसाठी प्रेरक व्याख्यान
यवतमाळ : प्रत्येक माणूस एखाद्या कामासाठी जीवन अर्पण करतो. मजूर, कारागीर, कलावंत आपापल्या क्षेत्रात मेहनत घेतात. पण सर्वांपेक्षा कलाकाराच्या कामाची प्रशंसा अधिक होते. कारण मजूर काम करताना केवळ हात वापरतो. कारागीर हातासोबतच मेंदूही वापरतो. पण कलावंत हात आणि मेंदूसोबतच आपल्या कामात हृदयही ओततो. म्हणून त्याचे काम अधिक लोकांना आवडते. प्रत्येक माणसाने आपल्या कामात मेहनतीसोबतच कलात्मकता आणली पाहिजे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, वक्ते शिव खेरा यांनी केले.
सोमवारी रोटरी क्लबतर्फे ‘यू कॅन विन’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक शिव खेरा यांचे प्रेरक व्याख्यान पोस्टल मैदानावर पार पडले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, रमेश मुणोत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदींसह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते शिव खेरा यांना ऐकण्यासाठी हजारो नागरिकांच्या गर्दीने संपूर्ण पोस्टल ग्राऊंड खचाखच भरले होते. त्यात विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आर्णी येथील तेजस माहुरे यांच्या गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. तर विक्रमसिंग दालवाला यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लबचे नीलेश धुमे, जगजितसिंग ओबेराय, विजय शेटे, उत्पल टोंगो, सुनील खडसे, शशांक देशमुख, संजय बजाज आदींनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. शिव खेरा आणि पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर येताच शिव खेरा यांनी पहिल्याच वाक्यात गर्दीचे मन काबीज केले. ते वाक्य होते, ‘साहब, आप लोगोने मुझे जो दिया हैं, वो हैं आपका टाईम. इससे बडी चिज दुसरी कोई नही होती.’ यशाचा सोपान सांगणाऱ्या माणसाने पहिला मंत्र दिला होता. पुढे देश-विदेशातील एकेक उदाहरणे सांगत त्यांनी यशस्वी जीवनाचे पासवर्ड उघड केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील व्याख्यान हजारो यवतमाळकर कानात प्राण आणून ऐकत होते. पण तब्बल सव्वा तास चाललेल्या व्याख्यानात रटाळपणा येऊ न देण्यासाठी खेरा यांनी मध्ये मध्ये विनोदही पेरला. बोलता-बोलता अचानक ते श्रोत्यांना विचारायचे, ‘येस आॅर नो?’, ‘आर यू विथ मी?’ जड तत्त्वज्ञान सामान्य प्रेक्षकांच्या गळी उतरविण्याची ही हातोटी यशस्वी ठरली. माईक बंद पडल्यावरही ते मिश्किलपणे म्हणाले, बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती हैं... या वाक्याने यवतमाळकरांची कळी अधिकच खुलली. (स्थानिक प्रतिनिधी)

शिव खेरा यांच्या व्याख्यानातील यशाचे मंत्र
इच्छा आणि इरादा : यशस्वी होण्याची इच्छा असणे आणि इरादा असणे यात फरक आहे. इच्छा कठीण प्रसंगी कमजोर पडते. पण संकट आल्यावर इरादा अधिक मजबूत बनतो. यशस्वी होण्याचा पक्का इरादा असावा.
आत्मविश्वास आणि अहंकार : कॅनडातील ‘पॉवर आॅफ पॉझिटिव्ह थिंकिंग’ पुस्तकाचे लेखक डॉ. पिल यांची उंची केवळ साडेचार-पाच फूट. पण हजारो प्रेक्षकांपुढे बोलताना त्यांचा आत्मविश्वास दांडगा असतो. त्यांना पाहूनच मला कळले की, माणसाची उंची पायापासून डोक्यापर्यंत मोजायची नसते. तर खांद्यापासून डोक्यापर्यंत मोजायची असते. डॉ. पिल यांच्या बोलण्यात आत्मविश्वास असला तरी नम्रता असते. जेव्हा आत्मविश्वासू माणूस नम्रता सोडतो, तेव्हा त्याला अहंकारी म्हणतात.
समस्या आणि स्मशान : काही लोक म्हणतात, माझ्या जीवनात खूप समस्या आहेत. मी यशस्वी कसा होणार? पण केवळ स्मशान हेच असे एक ठिकाण आहे की, जिथे माणसाला कोणतीही समस्या भेडसावत नाही. जोवर माणूस जिवंत आहे, तोवर समस्या असणारच. किंबहुना समस्या आहेत, म्हणूनच आपल्या जगण्याला अर्थ आहे.
संतुलन अणि सुबुद्धी : देवाला नेहमी एकच प्रार्थना करावी. ‘जे मी बदलू शकत नाही, ते तुझी भेट म्हणून स्वीकारण्याचे संतुलन दे. जे मी बदलू शकतो, ते बदलण्याचे मला धाडस दे. आणि मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही, हे समजून घेण्याची मला सुबुद्धी दे.’
सवय आणि चारित्र्य : यशस्वी माणसे कोणतेही वेगळे काम करीत नाही. तर ते वेगळ्या पद्धतीने काम करतात. जीवनात स्वत:ला चांगल्या सवयी लावून घ्या. चांगल्या सवयींमुळेच चांगले चारित्र्य घडते. चांगल्या सवयी स्वीकारणे कठीण आहे. मात्र, चांगल्या सवयींमुळे जगणे सोपे बनते.
प्रॅक्टिस आणि परफेक्शन : ‘प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट’ हे तत्त्व पूर्णत: खरे नाही. ‘प्रॅक्टिस डझंट मेक्स परफेक्ट.’ कारण सरावामुळे परफेक्शन नाही येत, तर संबंधित कामात सातत्य (काम पर्मनंट होते) येते. एखादे काम परफेक्ट करण्यासाठी सरावासोबतच त्यात वेगळेपणा आवश्यक असतो. त्यामुळे सरावातही स्वत:ची वेगळी धाटणी जपली पाहिजे.
अंधश्रद्धा सोडा : मांजर आडवी गेली म्हणून सुशिक्षित माणसेही चालता-चालता थांबतात. टीव्हीवर सतत होरोस्कोप पाहिले जात आहे. या अंधश्रद्धेनेच लोकांना मानसिक, बौद्धिकदृष्ट्या कमजोर केले.
उठण्यापेक्षा पाडण्याची धडपड : आजच्या काळात लोकं स्वत:च्या दु:खापेक्षा दुसऱ्याचे सुख पाहून अधिक त्रस्त आहेत. ईर्षा आणि द्वेष सुशिक्षितांना मागे नेत आहे. जीवनाच्या मार्गावर स्वत: उठण्यापेक्षा दुसऱ्यांना पाडण्याचीच स्पर्धा लागलेली आहे.
कायदा आणि माणुसकी : कायद्यापेक्षाही माणुसकी श्रेष्ठ असते. जखमी माणसाला एखाद्या रुग्णालयात भरती केले जात नसेल अन् त्यावेळी मला रुग्णालयाच्या यंत्रणेला लाच देऊन त्या जखमी माणसाला भरती करावे लागले, तर कायद्याच्या दृष्टीने मी आरोपी ठरेल. पण माणुसकीच्या दृष्टीने मी निर्दोष असेल. ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडताना महात्मा गांधींनीही कायदा आणि माणुसकीतील (लिगॅलिटी अँड एथिक्स) फरकच स्पष्ट केला.
४ सत्य बोला : साधी सिनेमाची तिकीट चुकविण्यासाठी आपण मुलांचे वय कमी सांगतो. या छोट्या प्रसंगातूनच मुलांना खोटे बोलण्याची सवय लागते. त्यांच्या मनात हिनतेची भावना निर्माण होते. मोठे झाल्यावर हीच मुले काही पैशांसाठी मातृभूमीचा सौदा करतात. मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी आणलेले आरडीएक्स लपविण्यासाठी काही वर्दीवाल्यांनीच मदत केली. त्यामुळे नेहमी सत्य बोला. मुलांनाही तेच शिकवा.
४ चूक म्हणजे पाप नव्हे : काम करताना चुकणे म्हणजे पाप नव्हे. पण एकच चूक वारंवार करीत राहणे, हे खरेच पाप आहे. आपण स्वत:मध्ये सुधारणा घडवत राहिले पाहिजे. त्यातूनच प्रगती घडते.
४ निंदकांची काळजी नको : तुम्ही चांगले काम केले काय किंवा वाईट काम केले काय, समाजातील काही लोक सतत तुमची निंदा करीतच असतात. तुम्ही जर तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करीत असाल, तर निंदकांची काळजी करण्याची गरजच नाही. जगाने आजपर्यंत एकाही टीकाकाराला पुरस्कार दिला नाही. पण काम करणाऱ्यांची नेहमी जग दखल घेत असते.

Web Title: Attach artistry to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.