पांढरकवडात युरिया, खताची कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:12+5:30
तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : खरीप हंगामासाठी शेतकरी विविध रासायनिक खतांची खरेदी करीत असताना गत काही दिवसांपासून तालुक्यात युरिया व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत आहे. याबाबत कृषी विभागाने लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पांढरकवडा तालुक्यात अनेक शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी पीक घेतात. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांची ५२ हजार ५३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
तालुक्यात यंदाही कपाशी आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचे अधिक लक्ष्य आहे. आता पिके वाढीवर असून त्यामुळे शेतकºयांना युरियाची अतिशय आवश्यकता आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रात जावून युरियाबाबत विचारणा करतात. परंतु युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात.
खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चढ्या दरात युरिया खरेदी करावी लागत आहे. प्रत्येक हंगामातच कृषी विक्रेते युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट होत आहे.
कृषी केंद्रचालक करतात खताचे लिंकिंग
युरिया विकत घेताना कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा किटकनाशक विकत घेण्याची सक्ती करतात. इतर खते अथवा किटकनाशक खरेदी केले, तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागते. कृषी केंद्रचालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही.