‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा फलक दुसऱ्याच दिवशी काढला
By Admin | Updated: June 26, 2016 02:32 IST2016-06-26T02:32:51+5:302016-06-26T02:32:51+5:30
सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली.

‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा फलक दुसऱ्याच दिवशी काढला
राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था : रविवारी बँकांच्या मोहिमेचा अखेरचा टप्पा, शेतकरी सापडला आर्थिक संकटात
यवतमाळ : सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतक री पुढे आले. तर २६ जूनला मोहिमेचा शेवटचा टप्पा
आहे. आता बँकांनी गांभीर्य दाखविले तरच उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज येणार आहे. त्यावरच कर्ज वितरणाची टक्केवारी अवलंबून राहणार आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. यातून ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना हाती घेण्यात आली. त्याला राष्ट्रीयकृत बँकांनी होकार दिला. मात्र गावापर्यंत योजनीची प्रसिद्धी केली नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतकरी पुढे आले. दोन लाख २० हजार शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचलाच नाही. रविवारी २६ जूनला मोहिमेचा अंतिम टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात ज्या उणिवा राहिल्या, त्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण केल्या किंवा नाही याबाबत अर्जाच्या संख्येवरून उत्तर मिळेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण योजनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. यामुळे या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची मानली जात आहे. प्रतिसाद न देणाऱ्या बँकावर शासन कुठले पाऊल उचलणार यावरच कर्ज वाटपाचे गणित ठरणार आहे. (शहर वार्ताहर)
दाखल झालेले अर्ज
१९ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांकडे चार हजार १०३ अर्ज आले. यामध्ये ५८ हजार नीवन सभासदांपैकी एक हजार ४९९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नव्याने कर्ज मागणीसाठी अर्ज करणारे एक हजार ४१३ शेतकरी तर एक हजार १९१ शेतकऱ्यांचे पुनर्गठणाचे अर्ज आहेत.
फलक काढले
१९ जूनला कर्ज वितरणाचे फलक लावणाऱ्या बँकांनी २० जूनला फलक चक्क काढून घेतले. यामुळे काही बँका कर्ज वितरणाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. रविवारी शेतकरी व बँकांची परीक्षाच राहणार आहे. जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.