संचमान्यतेने कही खुशी-कही गम

By Admin | Updated: March 31, 2016 03:01 IST2016-03-31T03:01:09+5:302016-03-31T03:01:09+5:30

दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मंगळवारी मुख्याध्यापकांच्या हातात पडल्या.

Any kind of gam | संचमान्यतेने कही खुशी-कही गम

संचमान्यतेने कही खुशी-कही गम

शिक्षकेत्तरांचा गुंता कायमच : अनेक मुख्याध्यापक, शिक्षक ठरले अतिरिक्त
विनोद ताजने वणी
दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मंगळवारी मुख्याध्यापकांच्या हातात पडल्या. संच मान्यता बघून शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. कही खुशी-कही गम, अशी स्थिती संचमान्यतेने केली आहे.
जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिकचे वर्ग जोडलेले आहे, त्या शाळांची सुरू वर्षाची संच मान्यता अद्याप आली नाही. दोन्ही वर्षाच्या संचमान्यतेमध्ये शिक्षकेतराचा गुंताही सुटलाच नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील संभ्रम अद्याप कायम आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी संख्येच्या आधारावर, त्या शाळेस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मान्य संख्या संचमान्यतेद्वारे दरवर्षी ठरविली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून संचमान्यता रखडल्या होत्या.
माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी मंगळवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सभा घेऊन सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांच्या संचमान्यता तयार करून मुख्याध्यापकांच्या हाती दिल्या. शासनाच्या शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या शासन निर्णयाची सांगड जुळवून संचमान्यता तयार करणे, हे शिक्षण विभागापुढे मोठे आव्हान होते. तरीही ज्या माध्यमिक शाळांना अकरावी व बारावीचे वर्ग जोडलेले आहेत, त्यांच्या सन २०१५-१६ च्या संचमान्यता संपूर्ण राज्यातच तयार झाल्या नाही. तसेच शिक्षकेतरांच्या आकृतीबंधाचा फुगा न फुटल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे संचमान्यतेमध्ये दाखविण्यात आलीच नाही. केवळ सध्या कार्यरत पदेच दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आॅफ लाईन व आॅनलाईनचा गुंता कायमच आहे.
आठवी ते दहावीचे वर्ग असणाऱ्या अनेक शाळांमध्ये नववी व दहावी मिळून ९० विद्यार्थी नसल्याने त्या शाळांना मुख्याध्यापक पद मान्य झाले नाही. परिणामी अनेक मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त ठरले आहे. शिक्षक संस्था विद्यार्थी संख्येवर आधारित दिल्याने, काही शाळा दोन व तीन शिक्षकीही बनल्या आहे. मात्र शहरातील शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी असल्याने त्या शाळांना अधिकची शिक्षक संख्या मान्य झाली आहे. त्यामुळे ‘कही खुशी-कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. तथापि वाढलेली शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी नसल्याने पदे वाढूनही उपयोग नाही.
अनेक शिक्षक, मुख्याध्यापक नवीन संचमान्यतेत अतिरिक्त ठरले आहे. त्यांचे समायोजन केले जाणार का?, याचीही कोंडी शिक्षण विभागाने अजून फोडली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. आता शाळांतील उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही पदेसुद्धा तुकडींच्या संख्येवर न ठरवता शाळेतील मान्य शिक्षकांच्या पदांचा संख्येवरून ठरविण्यात आली आहे. यामध्ये पाचवीवरील शिक्षकांची संख्या विचारात घेतली गेली नाही, हे विशेष.

Web Title: Any kind of gam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.