सोयाबीनमध्ये सोडली जनावरे

By Admin | Updated: October 1, 2014 23:30 IST2014-10-01T23:30:04+5:302014-10-01T23:30:04+5:30

सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या

Animals left in soybeans | सोयाबीनमध्ये सोडली जनावरे

सोयाबीनमध्ये सोडली जनावरे

किडींचा प्रकोप : १० हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले
महागाव : सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तालुक्यातील अनेक सोयाबीनच्या शेतात जनावरांचे कळप चरताना दिसून येत आहे.
महागाव तालुक्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा झाली. गतवर्षी अतिवृष्टीने संपूर्ण पीक मातीमोल झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने पीक करपून गेले आहे. दुबार-तिबार पेरणीतून बचावलेले पीक सध्या विविध किडींच्या प्रादुर्भावात सापडले आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मोझॅकचा हल्ला झाल्याने पीक पिवळे पडू लागले आहे. अशा स्थितीत शेंगाही भरल्या नाही. वरून ऊन्ह तापत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेतांमध्ये जनावरे सोडल्याचे दिसत आहे. सोयाबीन वाळून मातीमोल होण्यापेक्षा जनावरांना तरी दोन घास मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
महागाव तालुक्यात कृषी विभागाने नुकसानीचा आकडा नुकताच घोषित केला. हा आकडा पाहून कृषिशास्त्रज्ञही चक्रावून गेले. रोगाची खात्री करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तालुक्यात दाखल झाले. त्यांनी हिवरा, सवना, कलगाव, अंबोडा परिसरात सोयाबीनची पाहणी केली. दुबार-तिबार केलेली पेरणी आणि काही प्रमाणात औषधाच्या मात्रा चुकल्या तर काही ठिकाणी बियाणे बनावट निघाले. त्यामुळे पिकावर मोझॅकचे आक्रमण झाले. परिणामी २० हजार हेक्टरपैकी १० हजार हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेले. कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून जिल्हा कृषी विभाग, कृषी विद्यापीठांना पाठविले. कृषी विभागाकडून सोयाबीन नुकसानीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकाराला कृषी विभाग, कृषी केंद्र संचालक की आणखी कोण जबाबदार असा प्रश्न शेतकरी करीत आहे.
अनेक शेतकऱ्यांना लागवडीच्या वेळी बनावट भिजलेले बियाणे देण्यात आले होते. याकडे कृषी विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कंपनीला आणि प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाने तालुक्यातील काही कृषी केंद्रातील बियाणे नमुना तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी अनुप एजंसी, पाटील बीज भंडार, मिता कृषी केंद्र, दत्त कृषी केंद्र सर्व मुडाणा आणि मीता एजंसी महागाव येथील नमुने अप्रमाणित असल्याचे पुढे आले. या कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही. आता तर शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. कोणत्याही शेतात गेल्यास सोयाबीनच्या पिकावर जनावरे ताव मारताना दिसत आहे. हतबल शेतकरी जनावरांना चारा म्हणून सोयाबीनच्या पिकात सोडत आहे.
सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसणे आणि सोने-नाणे गहाण ठेऊन पेरणी केली. रात्र-रात्र जागून ओलित केले. परंतु किडींनी पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतात जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. हतबल शेतकऱ्यांंना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Animals left in soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.