आॅफलाईन वेतनाने वाढला प्रचंड गोंधळ
By Admin | Updated: January 31, 2015 23:28 IST2015-01-31T23:28:58+5:302015-01-31T23:28:58+5:30
सन २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यामुळे एकाच शाळेत कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना काहींचे आॅनलाईन, तर अतिरिक्तचे वेतन

आॅफलाईन वेतनाने वाढला प्रचंड गोंधळ
वणी : सन २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यामुळे एकाच शाळेत कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना काहींचे आॅनलाईन, तर अतिरिक्तचे वेतन आॅफलाईन काढले जात आहे. दोन्ही प्रकारचे वेतन एकाच वेळी खात्यात जमा होत नसल्याने इतर कपातीची रक्कम भरताना शाळा प्रमुख गोंधळात पडत आहे. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिने उशिरा होत असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले जाते. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची या प्रणालीमध्ये आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र यावर्षीच्या सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शाळांची सन २०१३-१४ या वर्षाची संचमान्यता करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्याने काही शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले. तसेच प्रयोगशाळा परिचर व नाईक ही पदे व्यपगत झाल्याने त्यांनाही अतिरिक्त ठरविण्यात आले.
या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर १४ पर्यंतचे वेतन आॅफलाईन काढण्यात यावे व तोपर्यंत त्यांची समायोजनाची प्रक्रिया पूर्ण पाडून जानेवारी १५ या महिन्याचे वेतन आॅनलाईन काढण्यात यावे, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभाग व राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी २० आॅक्टोबर २०१४ ला काढले होते. मात्र काही संघटना न्यायालयात गेल्याने समायोजन प्रक्रिया रखडली. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतनही आॅफलाईनच काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पध्दतीने काढलेली वेतन देयके एकाच वेळी बँकेत जमा होत नसल्याने एकाच शाळेतील कर्मचाऱ्यांच्या इतर कपातीची रक्कम, आयकर, विमा, पतसंस्था या ठिकाणी दोन वेळा भरावी लागते.
त्यामुळे रोकडवही लिहीतानाही त्रास होतो. आॅफलाईनचे वेतन बरेच उशिरा जमा होत असल्याने एकाच शाळेतील काही कर्मचाऱ्यांचे वेतन आधी व काहींचे नंतर, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही अवस्था येत्या मार्च महिन्यापर्यंतही चालणारच आहे, असे संकेत प्राप्त होत आहे.
शाळाअंतर्गत पदोन्नती व समायोजनालासुध्दा परवानगी दिली जात नाही. यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे शाळा प्रमुखांना शालेय कामकाज चालविणे कठीण झाले आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यावरही विपरीत परिणाम पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)