सर्वच राजकीय पक्षांमध्ये झाली बंडखोरी
By Admin | Updated: September 27, 2014 23:21 IST2014-09-27T23:21:58+5:302014-09-27T23:21:58+5:30
प्रचंड अनिश्चिततेच्या सावटात जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक सापडली होती. युती-आघाडी तोडण्यासाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या स्थानिक नेत्यांचेही पितळ शुक्रवारी रात्री उघडे पडले तर काही प्

सर्वच राजकीय पक्षांमध्ये झाली बंडखोरी
विधानसभा निवडणूक : स्वहितासाठी प्रबळ दावेदारांना ठेवले बाहेर, तर कुठे ए-बी फॉर्म घेऊन उमेदवारांचा शोध
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
प्रचंड अनिश्चिततेच्या सावटात जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक सापडली होती. युती-आघाडी तोडण्यासाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या स्थानिक नेत्यांचेही पितळ शुक्रवारी रात्री उघडे पडले तर काही प्रमुखांनी याही संधीचे सोने करून घेतले. कुठे लाखोंच्या चर्चा होऊन तिकीटावर शिक्कामोर्तब झाला तर कुठे आपल्याच इतर पक्षातील सहकार्यांसाठी शब्द फिरविण्यात आला. रात्रीतून सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी व तडजोड झाली.
जिल्ह्याच्या राजकारणात एका रात्रीतून इतक्या नव्या समिकरणांनी आजपर्यंत कधीच जन्म घेतला नाही. सातत्याने उमेदवार कोण ठरणार याचीच उत्सूकता प्रत्येकाला होती. पक्ष कार्यकर्त्यांसह जनसामान्यांचीही उत्सुकता प्रत्येक क्षणी शिगेला पोहचत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ही उत्सुकता जिल्ह्याच्या सातही विधानसभा क्षेत्रात कायम होती.
यवतमाळ विधानसभेत शिवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार कोण ठरणार यावर सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेने बाहेरून येणाऱ्या प्रबळ दावेदाराला ऐनवेळी ‘नो-एंट्री’ दाखवत पक्षातील संतोष ढवळे यांना संधी दिली. यात नेत्याने इतर पक्षातील सहकाऱ्यांसाठी मोठा त्याग केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मध्यरात्रीच शिवसेनेचा उमेदवार निश्चित झाला. काँग्रेसचे राहुल ठाकरे हे रात्रीपर्यंत निश्चित होते. मात्र सकाळी १० वाजता उमेदवार बदलल्याची चर्चा रंगली. शेवटी दिल्लीहून आलेल्या फोनने सर्वांना हायसे वाटले. मनसेचा उमेदवार मनाजोगा नसल्याने एका मनसैनिकाने ऐनवेळी बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष नामांकन दाखल केले. यापूर्वीच भाजपातील बाबासाहेब गाडे पाटील आणि राजाभाऊ ठाकरे यांनी अपक्ष नामांकन दाखल करून बंडखोरी केली. मजेशीर बाब म्हणजे राजकीय वर्तुळात दादा असलेल्या घराण्यातील राजेंद्र उत्तमराव पाटील यांनी अपक्ष नामांकन दाखल केले. यावेळी काँग्रेस उमेदवारासोबत आलेले त्यांचे धाकटे बंधू मनीष उत्तमराव पाटील यांची मात्र पंचाईत झाली.
याहीपेक्षा मजेशीर बाब आर्णी विधानसभेत घडली. भाजपाकडून उमेदवारीसाठी कालपर्यंत स्पर्धेत असलेल्या माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांना डावलण्यात आले.
उमेदवारी जाणार हे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन अर्ज दाखल केला. तर दोन दिवसांपूर्वी सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या विष्णू उकंडे यांनी आपला लढाऊ बाणा दाखवत राष्ट्रवादीच्या घड्याळाला हाताशी धरत नामांकन दाखल केले. उमरखेडमध्ये भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर पांढरे यांनी आपले कमळ फुलणार नाही हे लक्षात येताच विधानसभेसाठी शिवसेनेचा धनुष्य उचलून नामांकन भरले. वणीत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर जाणाऱ्या संजय देरकर यांची मनोकामना आघाडी तोडून राष्ट्रवादीनेच पूर्ण केली. ते आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. पुसद विधानसभेत एका राष्ट्रीय पक्षावर ए-बी फॉर्म घेवून उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. या कामी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाला लावण्यात आले होते. पुसदमध्ये नीलय नाईकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. परंतू ते मनोहरराव नाईकांच्या व्यासपीठावर दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आग्रह करूनही त्यांनी हाती माईक न घेतल्याने त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले. पुसद, दिग्रस, राळेगाव मतदारसंघ वगळता सर्वच ठिकाणी प्रमुख पक्षातील इच्छुकांकडून बंडखोरी करण्यात आली आहे.