धुळीमुळे गुदमरतोय सर्वांचाच जीव
By Admin | Updated: May 27, 2015 02:24 IST2015-05-27T02:24:50+5:302015-05-27T02:24:50+5:30
वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे.

धुळीमुळे गुदमरतोय सर्वांचाच जीव
श्वसन, डोळ्यांचे आजार : प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांची निर्माण झाली गरज
नांदेपेरा : वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे.
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वादळ, वारा सुटतो. वाऱ्याचे गोल भवरे अनेकदा तयार होतात. या भवऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण असतात. ते वाऱ्याबरोबर उंच आकाशात उडतात. हीच धूळ वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. धूळ उडाल्यानंतर वाहनधारकांना वाहन चालविताना समोरचे काहीच दिसत नाही. एवढ्या प्रमाणात हवेत धूळ असते. या धुळीमुळे आता नागरिकांना श्वसन व डोळ्यांचे आजार निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे. मात्र या धुळीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी चुप्पी साधून आहेत.
तालुक्यात अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून दररोज हजारो टन कोळशाचे उत्खनन केले जाते. हाच कोळसा विविध वाहनांव्दारे संबंधित कोलडेपो, रेल्वे सायडींगरव पोहोचविला जातो. कोळशाची वाहतूक करताना वाहनातून काही प्रमाणात कोळसा रस्त्याच्या आजूबाजूला सांडतो. त्यावरून इतर वाहने जातात. त्यामुळे त्या कोळशाची बारीक भुकटी तयार होते. ती वातावरणात पसरते. याच भुकटीवरून एखादे वाहन गेल्यास ती धूळ उडून नागरिकांच्या शरीरात जाते.
चिखलगाव, लालगुडा, नांदेपेरा बायपासवरून कोळशाचे ओव्हरलोड ट्रक दररोज धावतात. या परिसरात ही धूळ नेहमी साचून असते. रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून वाहने जाण्याची संख्या अधिक आहे. दिवस-रात्र कोळशाचे वाहन या रस्त्यावरून कायम धावत राहतात. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना वाहन चालविणे, तर अगदी कठीण झाले आहे. समोरून जड वाहन गेल्यानंतर दुचाकीधारकांना थोडी वाट बघूनच पुढे मार्गक्रमण कराव लागत आहे.
ही समस्या नवीन नाही. या धुळीबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही दिल्या. मात्र रस्ते व्यवस्थित साफ केले जात नाही. वेकोलिकडून रस्त्यावर पाणी शिंपडले जात नाही. त्यांनी रस्त्यांवर पाण्याचा शिडकाव करणे आवश्यक आहे. मात्र पाण्याचा शिडकावच जात नाही. परिणामी ही धूळ नाका-तोंडात, डोळ्यांत जात असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसन, डोळ्यांचे व इतर आजार बळावत आहेत. (वार्ताहर)