दिग्रस तालुक्याला हवा विकास
By Admin | Updated: June 4, 2017 01:12 IST2017-06-04T01:12:37+5:302017-06-04T01:12:37+5:30
गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे.

दिग्रस तालुक्याला हवा विकास
मोठा उद्योग नाही : सिंचनाची व्यवस्था तोकडी, शेतकरी-मजूर सापडले संकटात
प्रकाश सातघरे । लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या हातांना काम मिळेनासे झाले आहे. सिंचनाही व्यवस्था तोकडी असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवरही संकट ओढवले आहे.
गेल्या ३० वर्षांपूर्वी दिग्रस तालुक्याची निर्मिती झाली. निर्मितीपासूनच हा तालुका विकासात माघारला. तालुक्यात एकही मोठा उद्योग नाही. अनेक लहान उद्योगही नावापुरतेच सुरू आहे. येथील एमआयडीसीचा परिसर भकास पडला आहे. २५ वर्षांपूर्वी येथे एमआयडीसी स्थापना करण्यात आली. मात्र या एमआयडीसीत अद्याप एकही मोठा उद्योग सुरू होऊ शकला नाही. केवळ मोजकेच काही लघु उद्योग सुरु आहे. त्यातूनही बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणे कठीण झाले आहे. एमआयडीसीचा फलक तालुक्यातील बेरोजगारांना वाकुल्या दाखवित आहे. उद्योगांअभावी तालुक्यातील बेरोजगारांना इतरत्र भटकावे लागत आहे. दिग्रस शहरासह तालुक्यातही कुठेच प्रक्रिया उद्योग नाही. सूत गिरणी अथवा एखादा कारखानाही नाही. त्यामुळे तालुक्यातील कामगारांच्या हातांना काम नाही.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे घेतले जाते. मात्र जिनिंग आणि प्रेसिंगशिवाय तालुक्यात अद्याप सूत गिरणीही उभी राहू शकली नाही. जिनिंग प्रेसिंगही सध्या डबघाईस आल्या आहेत. त्यावरील कामगारही बेरोजगार होत आहे. आधीच उद्योग नसल्याने बेरोजगार दिशाहीन झाले आहे. त्यात सुरू असलेले काही लघु उद्योगही बंद पडत असल्याने रोजगाराची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला पुनरूज्जीवित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहराला लागून अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता प्रचंड आहे. मात्र योग्य धोरण नसल्याने त्यावरून सिंचन करणेही कठीण झाले आहे. सोबतच नियोजनशून्यतेमुळे शहराला पाणी मिळणेही कठीण झाले आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करता येत नाही. जवळपास ७० टक्के शेती कोरडवाहू आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांचेही हाल होत आहे. बेरोजगार, शेतकरी, मजूर सर्वांनाच उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
रस्त्यांची दुरवस्था
दिग्रस तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. अनेक गावांचे जोड रस्ते उखडले आहेत. अनेक रस्त्यांचे केवळ गाजावाजा करून भूमिपूजन उरकण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामच सुरू झाले नाही. यापूर्वीचे काही रस्ते आता शेवटच्या घटका मोजत आहे. या रस्त्यांवर सर्वत्र उखडलेली गिट्टी पसरली आहे. रस्त्यांअभावी गावांचा विकासही खुंटला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कामाअभावी बेरोजगारांसह मजुरांनाही परजिल्हा व परप्रांतात स्थलांतरण करावे लागत आहे.
क्रीडासंकूल रखडले
काही वर्षांपूर्वी दिग्रसमध्ये थाटामाटात क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील क्रीडापटूंची निराशा झाली आहे. कबड्डी आणि खो-खोमध्ये राज्याला नामवंत खेळाडू देणाऱ्या तालुक्यात साधे क्रीडा संकूलही पूर्ण झाले नाही. यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात तब्बल ९५२ घरकुलांचे कामही आरोप-प्रत्यारोपांमुळे रेंगाळले आहे.