दोन वर्षांनंतर कोरोना रुग्णसंख्या शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:07+5:30
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरित नऊ सदस्यांना १० मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

दोन वर्षांनंतर कोरोना रुग्णसंख्या शून्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील दोन वर्षांपासून जिल्हा कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. मंगळवारी प्रथमच मार्च २०२० नंतर म्हणजे तब्बल दोन वर्षांनी कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसला तरी कोरोनाची संभाव्य लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांतून व्यक्त केले जात असल्याने नागरिकांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरित नऊ सदस्यांना १० मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नागपूर येथून १४ मार्च रोजी प्राप्त झाला असता या नऊ जणांपैकी दोघेजण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा हा आलेख सलग दोन वर्षे कमी-जास्त होत होता. मागील काही दिवसांपासून मात्र कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या मंदावत गेली. त्यातच मागील पाच दिवसांत झालेल्या तपासण्यांपैकी एकाचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही. दुसरीकडे सक्रिय असलेला रुग्णही बरा होऊन गेल्याने मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली.
एकाच दिवशी झाला होता ४६ जणांचा मृत्यू
- दोन वर्षांत जिल्ह्यात ७९ हजार ६५ जण पाॅझिटिव्ह आढळले होते. विशेष म्हणजे ३ मे २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक १३९९ रुग्ण आढळले. तर २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ४६ मृत्यूची नोंद झाली.