सहा महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य
By Admin | Updated: August 24, 2015 00:14 IST2015-08-24T00:14:24+5:302015-08-24T00:14:24+5:30
अरुणावती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचा खून अनैतिक संबंध आणि शेतीच्या वादातून झाल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले.

सहा महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य
मोखची घटना : पत्नीसह चौघांना अटक
दिग्रस : अरुणावती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचा खून अनैतिक संबंध आणि शेतीच्या वादातून झाल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पत्नीसह जवळच्या चार नातेवाईकांना अटक केली असून त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी एका पोत्यात बांधून सदर इसमाचा मृतदेह फेकल्याचे पुढे आले. या घटनेचे रहस्य तब्बल सहा महिन्यानंतर उलगडले.
एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचे प्रेत पोत्यामध्ये मोठ्या दगडासह तारेने बांधलेले २१ मार्च रोजी आढळून आले होते. या इसमाचा खून केल्याचा संशय होता. वैद्यकीय अहवालात त्याचा गळा दाबून खून केल्याचे पुढे आले होते. मात्र मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दिग्रस पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी सखोल तपास केला. गोपनीय माहितीवरून तो मोख येथीलच रामकृष्ण उकंडाजी बेंद्रे (६०) असल्याचे निष्पन्न झाले. तो मूळचा मानोरा तालुक्यातील जनुना येथील होता. काही वर्षापासून तो मोख येथे दुसऱ्या पत्नीसह शेती करीत होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकावर तपास केंद्रीत केला. तेव्हा खून त्याची दुसरी पत्नी वेणूबाई रामकृष्ण बेंद्रे (५०), साळा देवराव श्रावण भगत (४८), दोघे रा. मोख ता. दिग्रस, साळी शांताबाई संतोष धुर्वे (३५) आणि साडभाऊ संतोष तुळशीराम धुर्वे (४०) रा. जयपूर ता. कारंजा यांनी केल्याचे निष्पन्न झाले. शेतीच्या वादातून आणि अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली या चौघांनी पोलिसांपुढे दिली. सदर तपास डीवायएसपी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नारायण पवार, गजानन पत्रे, सायबर सेलचे सुमित पालेकर यांनी केला. (प्रतिनिधी )