लग्नानंतर अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न

By Admin | Updated: December 10, 2014 23:04 IST2014-12-10T23:04:43+5:302014-12-10T23:04:43+5:30

‘लग्नानंतर अवघ्या दीड तासात पुत्ररत्न’ वाचून खरे वाटत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. नेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ९ वाजता एका मंदिरात प्रेमप्रकरणातून विवाह पार पडला.

After just one and a half hour after the wedding, | लग्नानंतर अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न

लग्नानंतर अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न

प्रेमविवाह : दोनही परिवारांनी दिला सामंजस्याचा परिचय
पांडुरंग भोयर - सोनखास
‘लग्नानंतर अवघ्या दीड तासात पुत्ररत्न’ वाचून खरे वाटत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. नेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ९ वाजता एका मंदिरात प्रेमप्रकरणातून विवाह पार पडला. मंगलाष्टके आटोपत नाही तोच नववधूला प्रसवकळा सुरू झाल्या आणि अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न प्राप्त झाले. लग्न आणि बाळंतपण एकाच दिवशी असा अनोखा प्रसंग या गावकऱ्यांनी अनुभवला.
एका तरुणाचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडले. प्रेमात जगण्या मरण्याच्या आनाभाका घेतल्या. जवळीकता वाढत गेली आणि जे होऊ नये तेच झाले. तरुणी गर्भवती राहिली. मात्र हा प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. मात्र काही दिवसातच घरच्यांच्या हा प्रकार लक्षात आला. तिला याबाबत विचारणा केली. मात्र ती एक शब्दही बोलायला तयार नव्हती. कुणाचेही नाव घेत नव्हती. घरच्या मंडळींनी विनवणी करण्यात दोन-तीन महिने गेले. तोपर्यंत ती सहा महिन्याची गर्भवती झाली. आता गावात आपली बदनामी होईल या भीतीतून तिने घरच्यांना आपल्या प्रियकराचे नाव सांगितले. घरच्यांनी नातेवाईकांना बोलावून काय करता येईल यावर चर्चा केली. लग्नाशिवाय कोणताच पर्याय नाही, असा सल्ला नातेवाईकांनी दिला. त्यावरून त्या तरुणाच्या नातेवाईकांची भेट घेतली. सुरुवातीला या तरुणाने आडेवेढे घेतले. या प्रकारात सदर तरुणीचे दिवस भरत आले होते. लग्नासाठी एकदाचा तो तरुण तयार झाला. यानंतर गावातीलच मंदिरात मंगळवारी लग्न करण्याचे ठरले. दोनही कडील मोजक्या पाहुण्या मंडळींच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता साध्या पद्धतीने हार टाकून विवाह पार पडला. वरात घरी गेली. काही वेळातच नववधुला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती शेजारी असलेल्या आपल्या आईच्या घरी गेली आणि तेथे रात्री १०.३० वाजता बाळंत होऊन पुत्ररत्न प्राप्त झाले. लग्न आणि बाळंतपण एकाच दिवशी तेही अवघ्या दीड तासाच्या अंतराने होण्याची ही घटना यवतमाळ-नेर मार्गावरील त्या गावाने अनुभवली. दोनही परिवाराने सामंजस्य दाखविल्याने दोन प्रेमीजीव एकत्र आले आणि संसारवेलीवर एक फुलही उमलले. मात्र या घटनेची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

Web Title: After just one and a half hour after the wedding,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.