मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पालिकेचा गोठा पूर्वपदावर

By Admin | Updated: June 11, 2016 02:49 IST2016-06-11T02:49:57+5:302016-06-11T02:49:57+5:30

शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला.

After the Chief Minister's posting, | मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पालिकेचा गोठा पूर्वपदावर

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पालिकेचा गोठा पूर्वपदावर

लाखो रुपये खर्च : दुर्गंधी रोखण्यासाठी सुगंधी पावडरचा वापर, पावसाळ्यात सहन करावा लागतो जीवघेणा त्रास
यवतमाळ : शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला. काही तासांपुरता या भागाचा कायापालट झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन होणार असल्याने स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करून ही जागा सुस्वरूप आणि सुगंधित केली. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ही जागा पूर्वपदावर आली आहे. शहरातून गोळा होणारा ओला आणि सुका कचरा या जागेत आणून टाकला जात आहे. परिणामी याठिकाणी डुकरं आणि जनावरांचा मुक्त संचार वाढण्यासोबतच दुर्गंधी पसरली आहे.
बसस्थानकाकडून आर्णी रोडकडे जाणाऱ्या एका मोकळ्या जागेत काही काळांपूर्वी नगरपरिषदेची वाहने, अडगळीतील वस्तू ठेवल्या जात होत्या. या जागेला कार्यशाळा म्हणून ओळखले जात होते. अलीकडे काही वर्षात मात्र ही ओळख पुसली जावून तिला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या विविध भागातून घंटागाड्यांद्वारे आणला गेलेला कचरा याठिकाणी टाकला जातो. त्यात रुग्णालयांमधील जैविक कचऱ्याचाही यात समावेश राहतो. कचरा वाढल्यानंतर जेसीबीने उचलून इतर ठिकाणी हलविला जातो. हे काम करताना मोठमोठे खड्डे तयार होते. पावसाळ्यात त्यात पाणी साचून कचरा सडतो. त्यामुळे वाढणाऱ्या दुर्गंधीने जीवघेणा त्रास होतो. या भागातील संपूर्ण पाणी थेट बसस्थानकाच्या नालीपर्यंत पोहोचते. याचा त्रास सदर भागात असलेल्या शाळा, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, आर्णी मार्गाने ये-जा करणारे नागरिक, विद्युत कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि या भागात वास्तव्याला असलेल्या नागरिकांना होतो. हा प्रकार थांबविण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी पालिका ते जिल्हा प्रशासनापर्यंत पाठपुरावा करूनही उपयोग नाही.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. मुरूम, चुरी टाकून जागा एकसोय करण्यात आली. दुर्गंधी येणार नाही यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. या जागेत काहीतरी चांगले होणार, आज आहे त्या स्थितीत राहील, असे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे.
बलवंत राऊत, अशोक सिंघानिया, शेख जाकीर, राजू बत्रा, दीपक मानेकर, रशीदभाई, सुधाकर मानेकर, रऊफ बेग मिर्झा, प्रमोद राय, जऊरभाई, दिगांबर अवसरे, पुष्पाताई पलगंटवार, वर्षा राऊत, नीलूबाई खत्री, श्याम सोलंकी, गजानन राऊत, रामप्रसाद चौधरी, इमरान चाऊस, राजू खान, रफिकभाई आदींनी याठिकाणी कचरा टाकला जावू नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली. पालिकेने मात्र याची दखल घेतली नाही. (वार्ताहर)

Web Title: After the Chief Minister's posting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.