विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित
By Admin | Updated: June 12, 2017 02:06 IST2017-06-12T02:06:13+5:302017-06-12T02:06:13+5:30
पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते.

विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित
महावितरणविरूद्ध रोष : दिवसभरातून ४० ते ५० वेळा खंडित होतो वीज पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. परंतु ग्रामीण भागात वीज असूनही नसल्यासारखीच आहे. विजेअभावी ग्रामीण जनतेचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माणसे फक्त शहरातच राहतात काय? खेड्यांमध्ये जनावरेच असतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण जनता विचारत आहे.
वीज ही आता सजीवांना अन्न पाण्याएवढीच गरजेची बाब ठरली आहे. अन्नावाचून दोन दिवस सजीव काढू शकतील. परंतु दोन दिवस वीज नसेल, तर जीवांचे इतके हाल होतात की, सजीवांना जगणे त्रासदायक ठरते. अलिकडच्या काळात वीज एवढी दुर्बल का झाली, हे जनतेलाही समजायला मार्ग नाही. थोडीसी वाऱ्याची झुळूक आली तरी वीज खंडित होते. मग ती पुन्हा केव्हा सुरू होणार, याचा नेमही नसतो. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील खेडे मुलभूत सुविधांनी सशक्त करण्याचे कार्य सरकारला अजूनही जमले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
वीज निर्मीती करण्यासाठी लागणारी कच्ची सामग्री मुबलक प्रमाणात असूनही राज्यातील जनतेला विजेचे चटके सहन करावे लागत आहे, ही राज्याची शोकांतिका आहे. प्रत्येक सरकार आरूढ होताना तीन वर्षात राज्य विजेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होणार, सर्वांना २४ तास वीज मिळणार, असे आश्वासन देत आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याचे कोणत्याही शासनाला अजूनतरी जमले नाही. ग्रामीण जनता अजूनही विजेअभावी तडफडताना दिसून येते.
तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यासाठी कायर, शिंदोला, पुनवट, लालगुडा येथे उपकेंद्र दिले आहेत. शिरपूर येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे, तेथे सहाय्यक अभियंता दर्जाचा अधिकारी नेमला आहे. तरीही ग्रामीण भागातील वीज सुरळीत चालू ठेवण्यात कंपनी अपयशी ठरत आहे. वीज सुरू असली तरी ती दिवसभर अविरतपणे सुरू आहे, असा दिवस खेड्यातील जनतेला पाहायला मिळतच नाही. दिवसभरातून ४० ते ५० वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. बहुतेक वेळा तर एकदा गेलेली वीज दोन-दोन दिवस सुरू होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील पिठगीरण्या बंद राहतात. लघु व्यावसायीकाचे व्यवसायाचे खोबरे होते.
महत्त्वाचे म्हणजे बहुतांश खेड्यात पाणी पुरवठा हा विंधन विहिरीवरून आहे. वीज नसल्याने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनतेचे प्रचंड हाल होतात. एक-दोन दिवस आंघोळ करणेसुद्धा टाळावे लागते. जनावरांना पाणी कोठून पाजावे, हा प्रश्न पडतो. शहरातील वीज पुरवठा खंडित होताच कंपनीचे कर्मचारी धावपळ करून तो तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न करतात. तर मग ग्रामीण भागासाठी हीच तत्परता का दाखविली जात नाही, असा ग्रामवासीयांचा सवाल आहे.
विद्युत सहाय्यकाच्या नेमणुकीकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागातील विजेची देखभाल करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या शिफारशीने एक विद्युत सहाय्यक नेमण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही या नेमणुका केल्या नाही. बहुतांश गावांमध्ये वीज कर्मचारी नसल्याने एखादा खासगी युवक जीव धोक्यात घालून वीज सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील अभियंता व कर्मचारी शहरात राहून कारभार सांभाळत असल्याने ते वेळेवर जनतेच्या कामी पडत नसल्याच्या तक्रारी गावातून होतात, याकडेही वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.