अडाणमध्येही ठणठणाट
By Admin | Updated: April 27, 2016 02:40 IST2016-04-27T02:40:18+5:302016-04-27T02:40:18+5:30
अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.

अडाणमध्येही ठणठणाट
तीव्र पाणीटंचाई : नदी काठावरील गावकऱ्यांची भटकंती
बोरीअरब : अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे दारव्हा तालुक्यातील बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या नदीकाठावरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्यासाठी माणसांनासुद्धा दूरवर पायपिट करावी लागत आहे.
गोकी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असताना शेतकऱ्यांना मिळणारे पाणी ३१ मार्च पूर्वीच बंद करून धरणात पाण्याची प्रचंड कपात केली आहे. त्यामुळे अडाण नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडले आहे व आता विहिरीसुद्धा ठणठण झाल्या आहेत. सद्यस्थितीत धरणात मुबलक व पुरेसा पाणीसाठी आहे. नदीत पाणी सोडण्यासाठी चारही गावच्या नागरिकांनी ग्रामपंचायत ठरावासह जिल्हाधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन धरणातले पाणी नदीत सोडण्याचे निर्देश दिले. परंतु पाण्यासाठी लागणारे पैसे भरणार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेजवळ एवढा पैसा नाही. यासाठी गावातील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व शेवटी पालकमंत्री यांच्याकडे हेलपाटे मारून थकले आहेत. प्रत्येक ठिकाणी केवळ आश्वासन मिळाले पाणी मात्र मिळाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संजय मानकर, ओमप्रकाश गुघाणे व बेलोरा, मंगरूळ, बोरी, तरोडा या चारही गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)