पंचायतचे प्रशासन ढेपाळले

By Admin | Updated: August 6, 2015 00:06 IST2015-08-06T00:06:01+5:302015-08-06T00:06:01+5:30

प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर कार्यरत येथील आदिवासीबहुल पंचायत समितीच्या प्रशासनाची अवस्था ढेपाळल्यागत झाली आहे.

The administration of the panchayat squeezed | पंचायतचे प्रशासन ढेपाळले

पंचायतचे प्रशासन ढेपाळले

नागरिक हतबल : गटविकास अधिकाऱ्यांचा भार अद्याप प्रभारावरच
मारेगाव : प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर कार्यरत येथील आदिवासीबहुल पंचायत समितीच्या प्रशासनाची अवस्था ढेपाळल्यागत झाली आहे. या ढिसाळ प्रशासनाचा फटका तालुक्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
येथील पंचायत समितीमधील विविध विभागात कार्यरत कर्मचारी कोण, केव्हा, कुठे जातो-येतो, याचा थांगपत्ता गटविकास अधिकाऱ्यांना सोडा, प्रशासन अधिकारी किंवा सहाय्यक प्रशासनाला नसावा, ही शोकांतिका आहे. विविध विभागातील काही कर्मचारी कार्यालयीन वेळात त्यांच्या खुर्चीवर सापडत नसून ते पानटपरीवर किंवा आपली खुर्ची सोडून इतर विभागात गप्पा हाकताना दिसतात. कर्मचाऱ्यांच्या नावाच्या पट्याच आता बेपत्ता झाल्या आहे.
या पंचायत समितीचे नियमित गटविकास अधिकारी दीर्घ रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार सी.के. बोरकर सांभाळत आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या दीर्घ रजेमुळे अनेक देयके प्रलंबित आहे. त्यात घरकुल, शौचालयाची देयके आहेत. नियमित गटविकास अधिकारी रजेवरून परत रूजू झालेच नाही, तर लाभार्थ्यांना किती अनुदानापासून दिवस वंचित ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या देयकांबाबत लाभार्थी व ग्रामसेवक, कंत्राटदारात सतत तू-तू, मै-मै होत आहेत.
प्रभारी गटविकास अधिकारी कुणाला अडवू नका, स्वाक्षरींसाठी देयके टाकण्यासाठी संबंधितांना आर्जव करतात. प्रशासनात सुधारणा करून अस्वच्छ पंचायत समितीत स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न करतात. मात्र कर्मचाऱ्याकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळतच नाही. पंचायत विभागातील स्वच्छता अभियान कक्षातील कर्मचारी त्यांच्या खुर्च्यांवर कधीच सापडत नसल्याने ते ‘कुठे तरी‘ वेगळीच स्वच्छता मोहीम राबविण्यास जात असावेत, असा कयास काढला जात आहे.
पाणी पुरवठा व बांधकाम विभागात पाणी पुरवठा कर्मचारी कधीच टेबलवर सापडत नाही. टेबलावर ठेवलेल्या रजिस्टरवर तक्रार करूनच नागरिकांना समाधान मानावे लागते. बांधकाम विभागातील काही रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचारी कामाच्या ओझ्याखाली दबले असल्याचे बोलले जाते. अभियंते नेहमी दौऱ्यावर राहतात. शिक्षण विभागात सर्वाधिक आनंदीआनंद आहे. ३१ जुलैला गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाल्याने १ आॅगस्टला दुपारी ४ वाजताच येथील सर्व कर्मचाऱ्यांनी बुटी मारल्याचे दिसून आले. आरोग्य विभागात दोन आरोग्य विस्तार अधिकारी तालुक्यातील वेगाव, मार्डी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारासाठीच भटकत असतात. त्यामुळे या विभागात आरोग्य सेवक व कनिष्ठ सहायकांनाच आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. विस्तार अधिकाऱ्यांचे तर दर्शनच होत नाही.
बीआरसीमधील फिरते शिक्षक, साधन व्यक्ती यांचीसुद्धा अवस्था वेगळी नाही. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांचीही बदली झाल्याने नवीन अधिकारी रूजू होईपर्यंत याही विभागाची अवस्था कशी होईल, काही सांगता येत नाही. आधिच कर्मचाऱ्यांची वानवा, त्यात दुष्काळात तेरावा महिना, अशी अवस्था या विभागाची होणार आहे.
याच पंचायत समितीमधील काही कर्मचारी मात्र कामाची जबाबदारी व वेळेचे भान ठेवून पूर्णवेळ कार्यालयात थांबतात. या कर्मचाऱ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशी अपेक्षा आहे. पंचायत समितीच्या ढेपाळलेल्या प्रशासनाला योग्य दिशा, वळण देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आकस्मीक भेट देऊन उपचार करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The administration of the panchayat squeezed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.