लॅपटॉपसाठी प्रशासनाचा ‘काखेत कळसा’
By Admin | Updated: July 8, 2015 00:05 IST2015-07-08T00:05:27+5:302015-07-08T00:05:27+5:30
निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप बेपत्ता झाला. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन लॅपटॉप आणून देण्याची तंबीही देण्यात आली.

लॅपटॉपसाठी प्रशासनाचा ‘काखेत कळसा’
वर्षभरानंतर गवसला : तंबी दिल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ
यवतमाळ : निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप बेपत्ता झाला. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन लॅपटॉप आणून देण्याची तंबीही देण्यात आली. मात्र लॅपटॉपचा थांगपत्ता लागत नव्हता. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातील कार्यालयात आढळला. ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असाच काहीसा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुभवला.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून वर्षभरापूर्वी लॅपटॉप अचानक दिसेनासा झाला. शोधाशोध झाली, थांगपत्ता लागत नव्हता. अनेक कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन तंबी देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. शेवटी या कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच आपली कैफियत मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानातील कार्यालयात कपाटात एक लॅपटॉप ठेऊन आहे, तो हाच आहे काय याची खात्री करा, असे सांगितले.
त्यावरून मंगळवारी कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थानातील कार्यालयातील कपाट उघडले. तेव्हा निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून गायब असलेला लॅपटॉप हाती लागला. विशेष म्हणजे, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी वर्षभरापूर्वी कामानिमित्त लॅपटॉप मागितला होता. त्यानंतर या लॅपटॉपची कुणालाही आठवण नव्हती. तर दुसरीकडे चोरीचा संशय घेऊन कर्मचाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते.
महसूल वर्तुळात ही घटना चांगलाच चर्चेचा विषय ठरली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच लॅपटॉप असूनही त्याची प्रशासनाकडे नोंद नसल्याची बाबही उघड झाली. अगदी साध्यासाध्या गोष्टींवरूनही मोठा इश्यू होत असल्याची चर्चा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)