१२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त क्रीडागुण
By Admin | Updated: February 11, 2015 00:06 IST2015-02-11T00:06:49+5:302015-02-11T00:06:49+5:30
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्राचाही विकास व्हावा यासाठी शासनाने आता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त क्रीडागुण
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्राचाही विकास व्हावा यासाठी शासनाने आता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाच्या प्रकारानुसार विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार असून त्यासाठी शाळांना क्रीडा विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
राज्य शासनाने एक अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यातील क्रीडा नैपुण्याला चालना मिळणार आहे. सध्या प्रत्येक जण करिअरच्या मागे लागून केवळ अभ्यास आणि अभ्यासच करतात. पालकही त्यांना केवळ अभ्यासासाठीच प्रोत्साहन देतात. अशा स्थितीत विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांचा विकास होत नाही. हा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी आता क्रीडा गुण दिले जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचा फायदा मिळणार आहे. यामध्ये शारीरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्याला अतिरिक्त गुण दिले जाणार आहे. २५, ५०, ७५ आणि १०० असे गुण विद्यार्थ्यांना मिळविता येणार आहे.
नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या वर्षात राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५, २० आणि १५ गुणांची सवलत दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेल्या व राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव २५ गुण दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग आणि राज्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना वाढीव २० गुण दिले जाणार आहे. तर राज्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव १५ गुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
क्रीडा गुणासंदर्भात शाळांना प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठवावे लागणार आहे. त्यानंतर या गुणांची शिफारस होणार आहे. याबाबतचा अहवाल १३ मार्चपूर्वी सादर करण्याच्या सूचना क्रीडा विभागाने दिल्या आहेत. (शहर वार्ताहर)