स्वत:सोबतच इतरांना ‘बि’ घडविण्याचा ‘प्रयास’
By Admin | Updated: March 27, 2015 01:39 IST2015-03-27T01:39:24+5:302015-03-27T01:39:24+5:30
माणसाची प्रतिभा नकारात्मक परिस्थितीतच अधिक फुलते. संकटांचे रस्ते तुडवित यशाचे शिखर गाठले जाते.

स्वत:सोबतच इतरांना ‘बि’ घडविण्याचा ‘प्रयास’
ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ
यवतमाळ : माणसाची प्रतिभा नकारात्मक परिस्थितीतच अधिक फुलते. संकटांचे रस्ते तुडवित यशाचे शिखर गाठले जाते. अशाच यशाचे शिखर गाठणाऱ्या जिगरबाज माणसांच्या संघर्षाचा पट यवतमाळकरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १२ कार्यक्रमातून अनुभवला. पराभूत मानसिकतेतून माणसांना बाहेर काढण्याचा हा प्रयत्न म्हणजे ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ ही संवाद मालिका होय. स्वत:सोबत इतरांंना ‘बि’घडविण्याचा हा ‘प्रयास’ अनेकांच्या आयुष्याला पैलू पाडत आहे.
संत तुकारामाचा ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’ हा अभंग केंद्रस्थानी ठेऊन आतापर्यंत १२ संघर्षशील व्यक्तीमत्वे यवतमाळकरांसमोर आली. यातूनच ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ ही एकमेकांना घडविणारी प्रक्रिया समोर आली. डॉ. अविनाश सावजी नावाचा झपाटलेला एक माणूस. एका निश्चित ध्येयाने वेडा झालेला स्वत:सोबत घडविणारा. गेली २५ वर्ष त्यांचा हा अविरत प्रयास सुरू आहे. पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र या माणसाने पिंजून काढला. अनेकांच्या आयुष्याला पैलू पाडत असताना आता त्याला सामूहिक रुप येऊ लागले. प्रयास-सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रतिभावंतांना समोर आणले. राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांना यवतमाळातून आणून त्यांच्या प्रेरणास्पद मुलाखतीचे आयोजन त्यांनी केले.
गतवर्षीच्या १२ एप्रिल रोजी ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमाचे रोपटे यवतमाळात लावण्याचा प्रयास झाला. पाहता पाहता १२ संघर्षशील व्यक्तींनी आपला जीवनपट उलगडून दाखविला. राजेश ठोंबरे या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सर्पमित्राने सर्पदंश झालेल्या हजारो व्यक्तींचे प्राण वाचविले. दहा लाखापेक्षा जास्त लोकांचे सर्पयात्रेद्वारा प्रबोधन केले. २९ वेळा नाग, १९ वेळा मण्यार दंशासहीत एकूण ५५ वेळा विषारी सर्पदंश होऊनही प्रथमोपचार व उपचाराच्या सहाय्याने ते जीवंत आहे. एक पैसाही न घेता गेल्या २२ वर्षांपासून अविरत सुरू आहे. सापाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांचा हा थक्क करणारा जीवनपट यवतमाळकरांनी प्रयासच्या मदतीने अनुभवला. कॅन्सर झालेल्या काही डॉक्टर व रुग्णांची संघर्षगाथा १५ जून २०१४ रोजी अनुभवली, त्यावेळी अंगावर रोमांच उभे राहिले. नागपूरच्या स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. निर्मलाताई वझे, अमरावतीच्या छाया भट्ट, यवतमाळचे जीवतराम कटियारा, डॉ. सुरेश मुडे, शीलाताई कांबळे यांच्या अनुभवाने कॅन्सरग्रस्तांना जगण्याचे बळ दिले. घाटंजीच्या दिलासा संस्थेचे मधुकर धस या वंचितासाठी लढा देणाऱ्याची गाथा अनेकांना प्रेरणा देऊन गेली. ९४५ गावांमध्ये चार हजार महिला बचत गटांद्वारे ४८ हजार महिलांचे संघटन करून एक नवा विक्रमच मधुकर धस यांनी केला. सातारा येथील डॉ.अविनाश पोळ यांचा शंभर गावांचा कायापालट करणारा थरार यवतमाळकरांनी ऐकला. श्रमदानाची बिजे लोकांमध्ये रुजवित हा माणूस गावागावात पोहोचत आहे. यवतमाळचे भूसंपादन अधिकारी राजेश रामराव खवले यांची संघर्ष गाथा आणि इतरांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची धडपड आजही सुरू आहे.
या जिगरबाजांची आत्मवृत्ते ऐकून यवतमाळकर भारावलेच नाही तर कामाला लागले. प्रयास संस्थेच्या माध्यमातून आता समाजपयोगी कार्यासाठी ही मंडळी पुढे आली.