चार कृषी केंद्रांवर कारवाई
By Admin | Updated: June 6, 2015 23:57 IST2015-06-06T23:57:29+5:302015-06-06T23:57:29+5:30
कागदपत्रांशिवाय बियाण्यांची विक्री केल्या प्रकरणी येथील चार कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली.

चार कृषी केंद्रांवर कारवाई
आर्णीत मोहीम : कागदपत्र नसल्याने बियाण्यांची विक्री बंद
आर्णी : कागदपत्रांशिवाय बियाण्यांची विक्री केल्या प्रकरणी येथील चार कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कृषी केंद्रांना बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीररीत्या बियाण्यांची विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. गावखेड्यातील शेतकऱ्यांची शहरात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा कृषी केंद्र संचालक घेत आहेत. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना बियाण्यांची विक्री केली जात आहे. या विरोधात प्रभारी तालुका कृषी अधिकारी नालंदा भरणे, पंचायत समिती कृषी अधिकारी सुनील मोहेकर यांच्या भरारी पथकाने धडक मोहीम हाती घेतली.
विजय प्रेमसिंग अग्रवाल यांच्या शेतकरी एजन्सीत अंकुर कंपनीचे ६७ बॅग १५ हजार ७५० रुपयांचे सोयाबीन बियाणे आढळले. या बियाण्यांचे कागदपत्र नसल्याने विक्री थांबविण्यात आली. दशरथ मोतीराम अग्रवाल यांच्या दुर्गा एजन्सीमध्ये बोलगार्ड कंपनीचे ४२ हजार ७८० रुपये किमतीचे ४६ बॅग बियाणे कागदपत्रांशिवाय आढळले. रत्नाकर निलावार यांच्या श्रीराम कृषी केंद्रात महाबीजचे एक लाख ३८ हजार ७५० रुपयांचे ७४ बॅग सोयाबीन आढळले. तर श्रीकांत बुटले यांच्या विनोद कृषी केंद्रात अजीत १५५ या कपाशीचे वाण आढळले. कुठल्याही कागदपत्रांशिवाय या बियाण्यांची विक्री केली जात होती. पथकाने या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कृषी केंद्र चालकांकडे बियाण्यांचा साठा आहे. विक्रीसाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्याने भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. कागदपत्रांशिवाय विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवरील कारवाईची मोहीम तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)