नाम फाऊंडेशनने घेतली कृती समितीची दखल
By Admin | Updated: April 28, 2016 02:24 IST2016-04-28T02:24:04+5:302016-04-28T02:24:04+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला जलसंकटातून, शेतकरी आत्महत्यांपासून आणि वर्षानुवर्षे दारिद्र्यात जीवनयापन करणाऱ्या तळागाळातील माणसांच्या जीवनात ...

नाम फाऊंडेशनने घेतली कृती समितीची दखल
प्रशंसनीय कार्य : जिल्ह्यात जल आणि वन संपदेला परिपूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन
उमरखेड : संपूर्ण महाराष्ट्राला जलसंकटातून, शेतकरी आत्महत्यांपासून आणि वर्षानुवर्षे दारिद्र्यात जीवनयापन करणाऱ्या तळागाळातील माणसांच्या जीवनात उभारी आणण्याचा विडा उचलेल्या सिनेकलावंत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उमरखेडला भेट देवून कृती समितीच्या कार्याचे मंगळवारी कौतुक केले.
नाम फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक हरिश इथापे यांच्यासह श्याम पेटकर, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश चोरे, पुसदचे समन्वयक स्वप्नील देशमुख व इतर कार्यकर्त्यांचा या पथकात समावेश होता. उमरखेड परिसरात सुरू असलेल्या अंबोना तलाव कृती समितीच्या कार्याची पाहणी करून कौतुक केले. तलाव पुनर्निमाण कार्याची पाहणी झाल्यानंतर विश्रामगृहावर या चमूने पत्रकारांशी संवाद साधत नाम फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. नाम फाऊंडेशनचे कार्य अतुलनीय असून ज्या माणसाने म्हणजेच नाना पाटेकरांनी हे काम हाती घेतले आहे, ती एक व्यक्ती नसून वृत्ती असल्याचे सांगितले. पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर या भागातील लोक एकत्र आले, प्रसार माध्यमांनीसुद्धा त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे आपण भारावून गेल्याचे इथापे म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्याला जल आणि वन संपदेने परिपूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. अंबोना तलावाप्रमाणेच लेंडी नाला व लोणाळा नाल्याचे काम एकत्रिकरणातून केल्यास या भागातील जलसंपदा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाम संघटना स्वत:हून कुणालाही एक पैसाही वर्गणी मागत नाही. ज्यांची देण्याची इच्छा असेल ते संघटनेच्या केंद्रीय खात्यात स्वच्छेने देणगी जमा करू शकतात. तसेच या संघटनेत कुणीही पदाधिकारी नसून सगळे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मानापमानाची भानगडच नाही. संपूर्ण कार्याचे केंद्रबिंदू नाना आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नाम संघटनेने आतापर्यंत विदर्भ, मराठवाड्यात भरीव कार्य केले असून हे काम अव्याहत चालू राहणार आहे. त्यामध्ये नामतर्फे शेतकरी समस्या, विधवा महिलांच्या समस्या, पाणीटंचाई, गोरगरीब लोकांच्या उत्थापनासाठी संघटना कार्य करीत आहे. आतापर्यंत जवळजवळ दोन हजार २०० विधवा महिलांना प्रतिमहिला १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान दिले आहे. गरजू कुटुंबांना ४०० शेळ्यांचे वाटप, विदर्भात ४०० म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी उमरखेड तलाव कृती समितीने अवघ्या दोन तासात लोकांकडून जमविलेला दोन लाख ५० हजार रुपयांचा निधी नामच्या खात्यात वर्ग केल्याचे कृती समितीचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सहकार्यातून दुष्काळावर मात शक्य
पुसद येथील अंबोना विकास कृती समितीकडून उल्लेखनिय काम सुरू आहे. त्यांच्या या कामाला जनतेचे सहकार्य लाभत आहे. आदेशजी जैन यांच्या कुटुंबियांकडून २७ हजार रुपयांची रोख मदत या समितीला देण्यात आली. अंबोनातील गाळ उपसा करण्याच्या कामात नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत. अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी आपापल्या परिने या अभियानात सहभाग घेऊन शक्य ती मदत केल्यास दुष्काळी परिस्थितीवर निश्चितच मात करता येऊ शकते, असे मत अंबोना कृती समितीचे राजू जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.