८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

By Admin | Updated: July 1, 2015 00:20 IST2015-07-01T00:20:49+5:302015-07-01T00:20:49+5:30

मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

84 thousand hectares of crop danger | ८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या नशिबी यंदाही अवर्षणाचा सामना
पुसद : मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पुसद कृषी उपविभागातील चार तालुक्यातील ८४ हजार हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात आले आहे.
गत तीन वर्षांपासून पुसद उपविभागात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशा स्थितीत यंदा मृगनक्षत्रात शेवटच्या चरणात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. पुसद कृषी उपविभागात ८४ हजार ३८७ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. त्यात पुसद तालुक्यात २३ हजार ९१७, दिग्रस १७ हजार ४५०, उमरखेड २६ हजार ८३०, महागाव १६ हजार १८१ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. दमदार पावसाने बियाणे अंकुरले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान दिसू लागले. मात्र अवघ्या आठ दिवसातच निसर्गाने आपला रंग दाखविणे सुरू केले. उपविभागात आठ दिवसात कुठेही पावसाची साधी सर कोसळली नाही. आज बरसेल, उद्या बरसेल या आशेवर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र दररोज आकाश निरभ्र दिसते. उन्हाळ्यासारखी उन्ह तपत आहे. त्यामुळे जमिनीतून अंकुरलेले बियाणे कोमेजून जात आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ओलिताचा प्रयत्न चालविला आहे. परंतु वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर सोयाबीन उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. कपाशी आणखी चार-पाच दिवस तग धरु शकते. यासोबतच उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांचीही स्थिती गंभीर झाली आहे. पाऊस कोसळला नाही तर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. (लोकमत वृत्तसेवा)

उमरखेड तालुक्यात पिकांची स्थिती गंभीर
उमरखेड : गत आठ दिवसांपासून पावसाची एकही सर कोसळली नसल्याने उमरखेड तालुक्यातील पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. उमरखेड तालुक्यात आतापर्यंत १५४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा कितीतरी पाऊस या भागात झाला. गत वर्षी या तारखेला ५२७ मिमी पाऊस कोसळला होता. आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस आला नाही तर पिकांचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. तालुक्यातील पेरणी जवळपास आटोपली आहे. परंतु पाऊस नसल्याने पिके करपत आहे.

Web Title: 84 thousand hectares of crop danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.