पीक विम्याचे आठ कोटी ३६ लाखांचे वाटप रखडले

By Admin | Updated: July 17, 2015 02:34 IST2015-07-17T02:34:56+5:302015-07-17T02:34:56+5:30

राष्ट्रीय पीक विम्याचा मंजूर निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा झाला आहे.

8 crore 36 lakhs of crop insurance has been allocated | पीक विम्याचे आठ कोटी ३६ लाखांचे वाटप रखडले

पीक विम्याचे आठ कोटी ३६ लाखांचे वाटप रखडले

जिल्हा बँकेचा कारभार : वाटपासाठी कर्मचारी नसल्याचे कारण
महागाव : राष्ट्रीय पीक विम्याचा मंजूर निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा झाला आहे. परंतु अद्यापही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना वाटपच करण्यात आले नाही. माहिती घेतली असता केवळ बँकेत कर्मचारी नसल्याचे कारण समोर करण्यात येत आहे. महागाव तालुक्यातील सहा हजार ७१४ शेतकऱ्यांचे आठ कोटी ३६ लाख ६६ हजार ६७१ रुपये रखडले आहे.
शेतकरी पावसाअभावी चांगलाच मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक नाही. गतवर्षी पोटाला पिळ देऊन राष्ट्रीय पीक विम्याची रक्कम भरण्यात आली होती. शासनाकडून पीक विमा मंजूर झाला. रक्कम अदा करण्यात आली. महागाव, फुलसावंगी, हिवरा, काळी दौ., गुंज, मोरथ या सर्कलप्रमाणे पीक विम्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. महागाव सर्कलमध्ये कापसासाठी हेक्टरी सात हजार १३६ रुपये, सोयाबीनला ११ हजार ५५८, तूर १० हजार ५८०, उडीद दोन हजार ९८२, मूग दोन हजार ९२२ रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आले. असाच निधी महागाव तालुक्यातील इतर सर्कलचा आहे. सहा हजार ७१४ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. त्यांना देण्यात आलेली रक्कम जिल्हा बँकेच्या महागाव शाखेत जमा झाली आहे. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. एकट्या महागाव सर्कलमध्ये चार कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांना देणे आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात आलेली आठ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम रखडल्याने आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे ही रक्कम बँकेत पडून असून त्याचे व्याज मात्र बँकेला मिळत आहे. दोन दिवसात ही रक्कम २१ जुलै रोजी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 8 crore 36 lakhs of crop insurance has been allocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.