लघु सिंचनचे ३६ गावांत ७५ बंधारे
By Admin | Updated: February 10, 2016 03:05 IST2016-02-10T03:05:21+5:302016-02-10T03:05:21+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे.

लघु सिंचनचे ३६ गावांत ७५ बंधारे
२१ प्रगतिपथावर : ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन, पहुरचा बंधारा अजूनही तुडुंब
यवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या कामांना गती देण्यात आली आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) विभागाने मागील सहा महिन्यात ३६ गावांमध्ये ७५ बंधाऱ्यांची निर्मिती केली. २१ गावातील कामे प्रगतिपथावर आहे. निर्माण झालेल्या बंधाऱ्यातील पाण्याद्वारे ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती लघु सिंचन विभागाचे
कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहूर इजारा (ता.कळंब) येथे बांधलेला बंधारा अजूनही तुडुंब भरून आहे. यातील पाण्याच्या आधारे रबी पिकाचे सिंचन केले जात आहे. सतत तीन पंपाद्वारे उपसा करून ५० एकरात ओलित करण्यात येत आहे. दिग्रस तालुक्याच्या विठाळा येथे चार बंधाऱ्यातून २१ एकरात संरक्षित सिंचन करण्यात येत आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीची पातळी यावर्षी आॅगस्टमध्ये २५ फुट वाढली आहे. गतवर्षी १५ फुट एवढीच वाढली होती. हा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांनी सांगितले.
लघु सिंचन विभागाने ४० गावांमध्ये ९६ बंधाऱ्यांची कामे मे २०१५ अखेर हाती घेतली. यातील ७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या कामावर पाणीसाठी निर्मिती २०० सघमी असून निर्माण झालेली सिंचन क्षमता ३० हेक्टर (सिंगल फिलिंग गृहित धरून) आहे. सदर अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली होती. यातील ५७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात १७७ बांधाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातूनच ७५ कामे पूर्णत्वास गेली आहेत. सर्वाधिक ११ बंधारे कळंब आणि दारव्हा तालुक्यात पूर्ण झालेले आहे. पांढरकवडा तालुक्यात १० बंधारे बांधले आहे. प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये ही कामे घेण्यात आली. त्यामुळे पाण्याची पातळी टिकून राहण्यासोबतच सिंचनातही वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)