जिल्ह्यात सिंचनासाठी ६८७ कोटी
By Admin | Updated: July 13, 2015 00:11 IST2015-07-13T00:11:23+5:302015-07-13T00:11:23+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात सिंचनासाठी ६८७ कोटी
मंत्रिमंडळाचा निर्णय : १२०७ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखांचा निधी
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सिंचनासाठी तीन वर्षात ६८७ रुपये देण्यात येणार असून जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासोबतच बळीराजा चेतना अभियानासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण कार्यक्रम घोषित करण्यात आला. सिंचनाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध करून देण्याअंतर्गत जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना या वर्षासह पुढील तीन वर्षात ६८७ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी १९८ कोटी रुपये दिले जातील. २०१६-१७ मध्ये २७४ कोटी आणि २०१७-१८ मध्ये २१३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विशेष पथदर्शी कार्यक्रम तीन वर्षाचा असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. हा कक्ष शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे समन्वय करून अधिकाधिक शेतकऱ्यांंना लाभ देण्यासाठी काम करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील हा कक्ष कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसोबतच शेतकरी योजनांचे समन्वयन व आत्महत्याग्रस्तांचे सर्वेक्षण, योजनांची माहिती, आढावा घेतला जाईल, या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सचिव राहतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश राहणार आहे. ही समिती जिल्हा नियोजन समितीला उत्तरदायी राहील. पालकमंत्री वेळोवेळी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील. समितीच्या कामकाजासाठी शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले आहे. ग्रामस्तरावरही सरपंचाच्या अध्यक्षतेत समित्या स्थापन केल्या जातील. तसेच यवतमाळसह ग्रामीण रुग्णालयात मानोसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश
बळीराजा चेतना अभियान
जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नाटक, प्रवचन, पथनाट्य, कीर्तन, पोवाडे आदी द्वारे जनजागृती कार्यक्रम घेतले जातील. पालकमंत्री या अभियानाचे अध्यक्ष राहणार असून जिल्हाधिकारी सदस्य सचिव आणि बहुतांश सर्व अधिकारी सदस्य राहतील. अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
४शासनाने शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यात सात उपविभागात सात सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये उणिवा असल्यास त्या परस्पर दुरुस्त करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्महत्या झाल्यास सदर आत्महत्या थांबविता आली नसती का याबाबतची कारणमीमांसा करून १५ दिवसात सदर सचिवांना मुख्यमंत्र्यास अहवाल सादर करावा लागेल. तशी बाब आजच्या निर्णयात नोंदविण्यात आली आहे.