जिल्हा परिषदेत ६७ शिक्षकांच्या बदल्या
By Admin | Updated: May 18, 2016 02:43 IST2016-05-18T02:43:11+5:302016-05-18T02:43:11+5:30
जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू असून मंगळवारी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली.

जिल्हा परिषदेत ६७ शिक्षकांच्या बदल्या
मात्र दिवसभर संभ्रम : शिक्षकांची प्रचंड गर्दी
यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू असून मंगळवारी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत ६७ बदल्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
जिल्हा परिषदेत पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पदवीधर शिक्षकांच्या १९ विनंती, २४ प्रशासकीय आणि १४ मुख्याध्यापकांच्या तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या तीन विनंती बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेत शिक्षकांची प्रचंड गर्दी दिसून आली. पेसा आणि नक्षलग्रस्त क्षेत्रातील २३०० शिक्षकांची बदली प्रक्रिया बुधवारी पार पाडली जाणार आहे. या संबंधीच्या सूचना संबंधितांंना देण्यात आल्या आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आज चांगलाच संभ्रम निर्माण झाला. बदल्यांची पूर्व तयारी नसल्याने अनागोंदी दिसत होती. शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही यावर दिवसभर खल सुरू होता. नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांकडून सोईचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही होत आहे. दुपारपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांवर अधिकृतपणे बोलायलाही कुणी तयार नव्हते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांच्याकडे बदलीबाबत विचारणा केली असता दुपारपर्यंत ते निश्चित काहीच सांगू शकत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदलीवर नेमके काय सुरू आहे हे कळायलाही मार्ग नव्हता. यामुळे सर्व बदली इच्छुक शिक्षक गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. जिल्हा परिषद सभागृहासमोर पदवीधर शिक्षकांची गर्दी दिसत होती. सकाळपासून आलेल्या शिक्षकांना या ठिकाणी पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. त्याचा फटका अनेकांना बसला. नाव पुकारल्यानंतर येण्यास वेळ झाला तर सरळ बदलीचा आदेशच मिळण्याचा धसका अनेक शिक्षकांनी घेतल्याने कुणी येथून हलायलाही तयार नव्हते.