सात हजार कामांसाठी ६५ कोटींचा आराखडा
By Admin | Updated: May 20, 2014 23:58 IST2014-05-20T23:58:05+5:302014-05-20T23:58:05+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारची सहा हजार ९५४ कामे करून २० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सात हजार कामांसाठी ६५ कोटींचा आराखडा
राळेगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारची सहा हजार ९५४ कामे करून २० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी पंचायत समितीने अंदाजे ६५ कोटी रुपये खर्चाचा बृहत आराखडा तयार केला आहे. ३३३ अपूर्ण कामांवर ६.८६० लाख मनुष्य दिन रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यावर ११.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विभागाच्या वार्षिक अर्थसंकल्पातून ७७५ कामे घेतली जाणार आहे. याद्वारे १५.३१ लाख मनुष्य दिन रोजगार निर्मिती साधण्याचे आणि ४१०.५९ लाख रुपये खर्चाचे लक्ष्य आहे. विभागाच्या बृहत नियोजनातील नवीन चार हजार ४७६ कामे घेण्याचे आराखड्यात ठरविले आहे. त्यातून २०.३६६ लाख मनुष्य दिन रोजगाराचे उद्दिष्ट असून त्यावर ४०.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींनी घ्यावयाच्या विविध कामांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहे. शेततळे, अनघड दगडी बांध, पाणीपुरवठा विहीर, वैयक्तिक सिंचन विहिरी, वृक्ष लागवड, राजीव गांधी भवन, अंतर्गत रस्ता, पांदण रस्ता, नाली खोदकाम, कच्ची नाली, सार्वजनिक विहिरी, नाला सरळीकरण, कचराकुंडी, रोपवाटिका, वैयक्तिक शौचालये आदी कामांचा यात समावेश आहे. जवळपास ४४ प्रकारची विविध कामे यातून पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)