रुग्णालयात दररोज ६०० रुग्ण दाखल
By Admin | Updated: September 18, 2014 00:09 IST2014-09-18T00:09:28+5:302014-09-18T00:09:28+5:30
उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी

रुग्णालयात दररोज ६०० रुग्ण दाखल
अविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)
उमरखेड तालुक्यात विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील सततचा बदल व मध्यंतरी काही दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध आजारांची साथ तालुक्यात पसरली असून, शासकीय रुग्णालयात दररोज ६०० वर रुग्ण दाखल होत आहे.
मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल होत असले तरी त्यांची योग्य दखल मात्र रुग्णालयाकडून घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. याला विविध कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालयात आवश्यक ती औषधी उपलब्ध नसल्याचीे ओरड रुग्णांमधून होत आहे.
रुग्णांना त्वरित सेवा देण्यासाठी डॉक्टरसुद्धा वेळेवर हजर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुष वैद्यकीय अधिकारी असलेले दोन डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांसाठी असलेल्या सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या केवळ कागदावर सुरू आहेत. रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी असलेली प्रयोगशाळा गेल्या तीन महिन्यांपासून तंंत्रज्ञा अभावी रामभरौसे आहे. त्यामुळे विषाणूजन्य रुग्ण, हिवताप, डायफाईड, गरोदर माता यांना रक्ततपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेतचा आधार घ्यावा लागतो.
येथील प्रत्येक वार्डात दररोज ३० हून अधिक रुग्ण दाखल होतात. रुग्णसंख्येच्या तुलनेत आवश्यक औषधी पुरवठा नसल्याने अनेक रुग्णांना खासगी मेडिकलमधून आर्थिक भुर्दंड सहन करून औषधी खरेदी करावी लागते. क्षुल्लक आजारांसाठीसुद्धा शासकीय रुग्णालयामधून नांदेडला रेफर केले जाते.
स्थानिक रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून वागणूकसुद्धा निट दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. येथे दोन रुग्णवाहिका असून, एक अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे एकाच रुग्णवाहिकेवर भार पडत आहे. अशावेळी एकाचवेळी एक पेक्षा अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज पडल्यास खासगी वाहनांचा अधिक पैसे देऊन वापर करावा लागतो. क्षुल्लक कारणामुळे रुग्णवाहिका बंद आहे, परंतु रुग्णालय प्रशासन मात्र त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. रुग्णालयात असलेल्या अनेक सोयी-सुविधा बंद पडल्या असून, त्या पूर्ववत करण्याबाबत ठोस कारवाईच केल्या जात नसल्याचे दिसून येते. लहान मुलांना लागणारी औषधी उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्याप्रमाणात इतरत्र रेफर केले जात आहे. गोरगरीबांना ऐपत नसतानाही नाईलाजाने खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे.