ऑगस्ट महिन्यात ५९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:02+5:30
मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत्यूही झाला. मात्र जूनमध्ये पावसाळा सुरू होताच गारव्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणे सुरू झाले.

ऑगस्ट महिन्यात ५९ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाच्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यात ऑगस्ट महिना सर्वाधिक हॉट ठरला आहे. या एकाच महिन्यात तब्बल दोन हजार ३१४ पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविले गेले असून तब्बल ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण सापडण्याची गती ऑगस्ट पेक्षाही किती तरी पट अधिक आहे.
मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत्यूही झाला. मात्र जूनमध्ये पावसाळा सुरू होताच गारव्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणे सुरू झाले. मेच्या तुलनेत जूनमध्ये पाच पट तर जूनच्या तुलनेत जुलैमध्ये हे रुग्ण सहा पटीने वाढले. जुलैमध्ये रुग्णसंख्या ८०६ होती, ऑगस्टमध्ये हा आकडा थेट अडीच हजारांच्या घरात पोहोचला. मृत्यूसंख्याही १९ वरून तीन पटीने वाढून ५९ वर पोहोचली. आता सप्टेंबर महिना सुरू झाला. या महिन्याच्या सातच दिवसात कोरोना रुग्णसंख्या ११०० वर पोहोचली असून मृतांचा आकडा ३७ झाला आहे. यावरून संपूर्ण सप्टेंबर महिना आणि नंतरच्या ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची गती किती वेगवान असेल याचा अंदाज येतो. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात कोरोना रुग्ण अधिक वाढले. यावरून गारवा कोरोनासाठी पोषक असल्याचे स्पष्ट होते. पुढे तीन महिने हिवाळा आहे. ही थंडी कोरोनासाठी आणखी अनुकूल वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाची गती आणखी वाढते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांंनो, सावधगिरी बाळगा
रूग्णांची आकडेवारी पाहता आरोग्य विभागाने पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात कोरोना मृत्यू व रुग्णांची गती प्रचंड वाढत आहे. लवकरच येणाऱ्या हिवाळ्यात ही गती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या अकराशे पार गेली आहे. तब्बल ३७ जणांचे सात दिवसात मृत्यू झाले आहे. अनलॉकचा आणि नागरिकांच्या बेशिस्त व बिनधास्तपणे वावरण्याचा हा परिणाम मानला जातो. लॉकडाऊनच्या काळात कोरोना स्थिती बºयापैकी नियंत्रणात असल्याचे मार्च ते जुलै दरम्यान प्रशासनाकडे नोंदविल्या गेलेल्या एकूणच आकडेवारीवरून दिसून येते.