वीज केंद्र तोडफोडप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: August 29, 2014 00:06 IST2014-08-29T00:06:38+5:302014-08-29T00:06:38+5:30
तालुक्यातील मार्डी येथील वीज उपकेंद्राच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मार्डी परिसरातील गावकरी वीज

वीज केंद्र तोडफोडप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल
मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील वीज उपकेंद्राच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मार्डी परिसरातील गावकरी वीज वितरण केंद्रावर मंगळवारी रात्री धडकले होते. त्याठिकाणी तोडफोड करण्यात आली होती.
मार्डी येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. येथून १३ गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसात भारनियमनाच्या नावाखाली तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे मार्डी परिसरातील हिवरा, मजरा, दांडगाव, डोंगरगाव येथील नागरिक संतप्त झाले. तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी रात्री गावकरी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर धडकले. त्याठिकाणी त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच तेथे जमावाने तोडफोड करीत आपला रोष व्यक्त केला.
याप्रकरणी मार्डी वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता लक्ष्मण साळुंके यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत गैरकायद्याची मंडळी जमून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. दमदाटी करून साहित्याची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे म्हटले. या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी तब्बल ५०० जणांविरुद्ध विद्युत कायदा २००० चे कलम ३ तसेच भादंवि १४३, ३५३, ४०७, १३९, १४० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक संबंधित गावाकडे रवाना झाले आहे. वीज वितरणच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)