४३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By Admin | Updated: June 30, 2016 02:27 IST2016-06-30T02:27:51+5:302016-06-30T02:27:51+5:30
शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी चौकाचौकात लावण्यात आलेल्या ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ४३ कॅमेरे तीन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

४३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
यवतमाळ शहर : एअर लिंक कंपनीविरोधात शहर ठाण्यात तक्रार
यवतमाळ : शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी चौकाचौकात लावण्यात आलेल्या ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ४३ कॅमेरे तीन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणात पोलीस विभागाने कॅमेरे पुरविणाऱ्या एअर लिंक कंपनीविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यवतमाळ शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. २०१२-१३ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एअर लिंक कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यावेळी शहरात ६८ कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र त्यापैकी ४३ कॅमेरे सुरूच झाले नाही. आता तीन वर्ष झाले तरी हे कॅमेरे बंदच आहे. सद्यस्थितीत शहरातील केवळ २५ कॅमेरे सुरू आहे. सुरू असणाऱ्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात अनेक चौक येत नाही. त्यामुळे चौकात नेमके काय घडले, याचा अंदाज पोलिसांना बांधणे कठीण जात आहे. कार्यान्वित असलेल्या २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या स्वयंचलनात अनेक त्रुट्या आहे. या त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीकडे संपर्क साधला. मात्र संबंधित एअर लिंक कंपनीने टाळाटाळ केली. आता तीन वर्षे उलटले तरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरू नाही. कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे. शहरात गत काही दिवसात दरोडा, घरफोडी, मंगळसूत्र चोरी, बॅग पळविणे, चाकूहल्ला आदी घटना घडल्या आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी आवश्यक ते फुटेज उपलब्धच झाले नाही. त्यामुळे पोलिसांना खासगी ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घ्यावा लागतो.
शहरातील मुख्य चौकातीलच कॅमेरे बंद आहे. त्यांची दुरुस्तीही होत नाही. सुरू असलेले कॅमेऱ्यातही अनेक अडचणी आहे. या सर्व प्रकाराविरोधात पोलिसांनी चक्क एअर लिंक कंपनीच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)
रात्रीच्या वेळी अनेक कॅमेऱ्यात चित्रच कैद होत नाही
यवतमाळ शहरातील चौकांमधील २५ सीसीटीव्ही कॅमेरे सद्यस्थितीत सुरू आहे. परंतु या कॅमेऱ्यातही अनेक तांत्रिक बिघाड झालेले आहे. रात्रीच्या वेळी तर या कॅमेऱ्यात चित्रच येत नाही. दिसले तरी ते अस्पष्ट असतात. संबंधित कंपनीने उच्च प्रतीचे कॅमेरे लावण्याचे करारात मान्य केले होते. परंतु पूर्तता झाली नाही.
यवतमाळ शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून एअर लिंक कंपनीविरोधात तीन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून पुढील कारवाई लवकरच होईल.
- दिलीप चव्हाण
जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक