४२८२ जागा, ८९०३ उमेदवार
By Admin | Updated: July 17, 2015 02:33 IST2015-07-17T02:33:15+5:302015-07-17T02:33:15+5:30
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

४२८२ जागा, ८९०३ उमेदवार
५०२ ग्रामपंचायतींची निवडणूक : २५ जुलैला मतदान
यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील चार हजार २८२ जागेसाठी आठ हजार ९०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता खऱ्या अर्थाने गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच १२८ ग्रामपंचायतीमध्ये १३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील या निवडणुका गाव पुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. पक्षीय चिन्हावर ही निवडणूक होत असली तरी नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपा व शिवसेनेकडून या निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष विस्तार केला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही गावातील आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुका असल्या तरी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यामध्ये हिरीरीने सहभागी होताना दिसतात. आता रात्रीचा दिवस करून प्रचार केला जात आहे. मतदार यादी हातात घेऊन घरात किती मतदार आहेत, याचा शोध कार्यकर्ते घेत आहेत.
गावाबाहेरचे मतदार आणण्यासाठी नियोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी नातेसंबंध जोडून त्यांच्याकडून मतदान आपल्या बाजूने करण्यासाठी गळ घातली जात आहे. २४ जुलैच्या रात्रीपर्यंत ५०२ गावातील गावपुढारी व कार्यकर्ते यांच्या डोळ्याला झोप लागणार नाही. काहीही झाले तरी मतदान आपल्याच पारड्यात घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. उमेदवाराची दारोमदार ही प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आहे. (कार्यालय प्रतिनिधी)