कत्तलीसाठी जाणाऱ्या ४१ जनावरांची सुटका
By Admin | Updated: July 1, 2016 02:31 IST2016-07-01T02:31:43+5:302016-07-01T02:31:43+5:30
कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात ट्रकद्वारे नेण्यात येणाऱ्या ४१ जनावरांची पांढरकवडा पोलिसांनी सुटका केली.

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४१ जनावरांची सुटका
पांढरकवडा : कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात ट्रकद्वारे नेण्यात येणाऱ्या ४१ जनावरांची पांढरकवडा पोलिसांनी सुटका केली. ही घटना पिंपळखुटी येथे बुधवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
अब्दुल हग सरतारखा रा.कोचीखेडा (मध्यप्रदेश), इक्बाल खान मुमताज खान रा.ज्योतिनगर (मध्यप्रदेश), शकील खान अतिफ खान रा.नारवल (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे तिघेही बुधवारी रात्री ट्रक (क्रमांक एम.पी.०९-बी.एच.१०४२) ने ४१ जनावरांना निर्दयीपणे बांधून नेत होते. पांढरकवडा पोलिसांनी पिंपळखुटी गावाजवळ नाकाबंदी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या ट्रकमध्ये एकूण ४१ जनावरे होती. त्यांपैैकी तीन बैैल ठार झाल्याचे निदर्शनास आले, तर १० बैैल जखमी अवस्थेत होते. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४२९, ३४, पशु संरक्षण अधिनियम कलम ५, प्राण्यांचे संरक्षण अधिनियम ११, मुंबई पोलीस कलम ११९ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रकसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे, गिरडकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)