४० गावात विजेचा लपंडाव

By Admin | Updated: May 15, 2016 01:59 IST2016-05-15T01:59:17+5:302016-05-15T01:59:17+5:30

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे.

40 hidden in the village | ४० गावात विजेचा लपंडाव

४० गावात विजेचा लपंडाव

नागरिक त्रस्त : साखरा, ब्राह्मणगाव परिसरात आठ दिवसांपासून समस्या
उमरखेड : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरणचे कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील साखरा व ब्राह्मणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर जवळपास ४० गावांची जबाबदारी आहे. मात्र या चाळीसही गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात तालुक्यात रोष निर्माण झाला आहे.
ब्राह्मणगाव व साखरा या दोन ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, परजना, हरदडा, सोईट या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेले छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीमुळे मोठा फटका बसला आहे. घरगुती वापरातील विजेची उपकरणे विजेच्या लपंडावामुळे निरूपयोगी ठरत आहे. आधीच या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे कसेबसे उपलब्ध होणारे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. सध्या चालू असलेल्या प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. वीज खंडित राहिल्यामुळे त्याचा परिणाम लघुउद्योग, गिरणी, महासेवा केंद्र यांच्यावर होत आहे. गावातील पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईत नागरिकांचा जीव पाण्यासाठी कासावीस झाला आहे. व्यापारी वर्गात वीज वितरण कंपनीविरूद्ध रोष निर्माण झाला आहे.
शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, बालके, वृद्ध, तरुण, महिला अशा सगळ्यांचेच जगणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळेस हमखास वीजपुरवठा खंडित होत असल्याने कमालीच्या उष्णतामानामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. मे महिना असल्यामुळे सूर्य आग ओकत आहे. आधीच निसर्गाचा प्रकोप सुरू असून त्यात वीजही नसल्याने गर्मीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. रात्री-अपरात्री जाणाऱ्या विजेमुळे वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ब्राह्मणगाववासीयांचे हाल थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)

छोटे व्यवसाय मोडकळीस
तालुक्यातील तब्बल ४० गावांना अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे या गावांमधील छोटे व्यवसाय प्रभावित झाले आहे. पीठ गिरण्या बंद पडल्या आहेत. इस्त्री व्यवसाय कोळशाविना ठप्प पडला आहे. झेरॉक्सची दुकाने तर व्यावसायिकांनी काही दिवसांपुरती बंद ठेवणेच पसंत केले आहे. वारंवार खंडित होणाऱ्या आणि अनपेक्षितपणे येणाऱ्या विजेमुळे वीज उपकरणे निकामी होत आहे. त्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.

Web Title: 40 hidden in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.