खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार
By Admin | Updated: May 22, 2014 01:29 IST2014-05-22T01:29:39+5:302014-05-22T01:29:39+5:30
यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खते, बियाण्यांवर ३0 कोटींची उलाढाल होणार
वणी : यावर्षी खरीप हंगामात वणी तालुक्यात जवळपास ३0 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खते, बियाणे, तसेच विविध कृषी साहित्य खरेदीवर ही रक्कम खर्ची पडणार आहे. वणी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात खत आणि बियाण्यांची विक्री होते. हा तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात उच्च दर्जाचा कापूस निर्माण होतो. सोबतच मोठय़ा प्रमाणात कीटकनाशक आणि रसायनिक खतांची शेतकरी खरेदी करतात. तालुक्यात जवळपास २६ हजार शेतकरी आहेत. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३0 कोटी रुपयांची उलाढाल होते. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही रक्कम खर्ची पडते. खरीपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव हा ३0 कोटींचा खर्च करतात. पावसाचे संकेत प्रप्त झाल्याने शेतकरी बांधव आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्यात व्यस्त झाले आहे. आता तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकर्यांची गर्दी वाढू लागली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे दुरापास्त होत असल्याने अनेक शेतकर्यांनी आत्ताच बियाणे खरेदी सुरू केली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. बियाणे, खते, किटकनाशके खरेदीत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकार्यांनी गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे. तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. याशिवाय शेतकरी आता सोयाबिनकडेही वळले आहे. सोबतच खरीपात तूर, ज्वारी आदी पिकेही घेतली जातात. तथापि कापूस हेच अद्याप नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तरीही आता सोयाबिनकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. सोयाबिनलाही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जात अहे. खरीपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बियाणे बोगस, हे ओळखे कठीण असते. त्यासाठीच कृषी विभागाने गुणनियंत्रण पथकाची स्थापना केली आहे. बियाणे खरेदी करताना शेतकर्यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभगाला दिल्या आहेत. त्यानुसार येथील तालुका कृषी अधिकार्यांच्या नेतृत्वात नुकतेच हे पथक गठित करण्यात आले. त्यात पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांसह काहींचा समावेश आहे. हे पथक बोगस कृषी साहित्याचा शोध घेणार आहे. शेतकर्यांकडून तक्रार प्राप्त होताच हे पथक संबंधित वाणांची चौकशी करणार आहेत. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मात्र शेतकर्यांनी खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)